नवी दिल्ली, दि. 25 – आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या लोकांचा त्याग अविस्मरणीय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. देशात आणीबाणी लागू केली गेल्याला आज 75 वर्षे झाली. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशावर आणीबाणी लादली होती. त्या काळात देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि अनन्वित अत्याचार
सहन करणाऱ्या लोकांना आपण सलाम करत असल्याचे मोदींनी हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या ट्विट संदेशाबरोबर पंतप्रधानांनी आपल्या “मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमाची एक छोटी क्लीपदेखील शेअर केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या “मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी आणीबाणीचा
उल्लेख केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना आणीबाणीची आठवण करून दिली होती आणि देशातील लोकशाहीला गृहित धरू नका, असे आवाहनही केले होते. सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये
जोपर्यंत लोकशाही हिसकावून घेतली जात नाही, तोपर्यंत त्या लोकशाहीच्या अधिकारांचा आनंद समजू शकत नाही, असेही ते म्हणाले होते.
1977 साली लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी लोकांनी अन्य अधिकार आणि गरजांचा विचार न करता मतदान केले होते. लोकांनी केवळ देशातील लोकशाही वाचवण्यासाठीच मतदान केले होते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.