वाल्हे: पुरंदर तालुक्यात दुर्गम भागामधील पिंगोरी येथे मुंबईहुन आलेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल काल (ता.२३) रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.
तहसीलदार सरनोबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगोरी येथे ठाणे येथून आलेल्या जेष्ठ महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
सदर महिला मागिल दहा दिवसापूर्वी ठाणे येथून आपल्या पतीसह आपल्या पिंगोरी या मुळ गावी आली होती. सदर जेष्ठ महिला (वय५९) पिंगोरी येथील आपल्या घरीच होम क्वारंटाइन होत्या. दोन दिवसापूर्वी त्यांना ताप, खोकला येऊ लागल्याने, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान काल रात्री उशिरा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर, सरपंच विद्या यादव, पोलिस पाटील राहूल शिंदे, वाल्हे पोलिस ठाण्यातील हवालदार हनुमंत गार्डी व सहकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन, संबंधित रूग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींना क्वारंटाइन केले.
दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्याच्या हेतूने जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांसह गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक आबनावे सरपंच विद्या यादव , पोलीस पाटील राहुल शिंदे डॉ.अभिष भुजबळ हवालदार हनुमंत गार्डी औषध निर्माण अधिकारी शकील तांबोळी आदींच्या वतीने पिंगोरीच्या विविध भागात औषध फवारणी सह विविध उपाययोजना युद्धपातळीवर सुरु करण्यात आल्या आहेत.
तसेच वाल्हे गावापासून पिंगोरी हे गाव ७-८ किलोमीटर अंतरावर आहे. पिंगोरी गाव दुर्गम भागात असल्याने येथील नागरिकांना वाल्हे येथील बाजारपेठेतमध्ये खरेदीसाठी यावे लागते. काल रात्री उशिरा सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले. तेव्हा पासून वाल्हे परिसरामधील नागरिकांना चिंता वाटू लागली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून वाल्हे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सकाळी उघडलेली हॉटेल, तसेच इतर काही दुकान बंद केली. वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाऊस स्पीकरच्या साह्याने जनजागृती करत, नागरिकांना खबरदारी घेण्याबाबत, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान करण्यात येत असल्याचे सरपंच अमोल, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी सांगितले.