मुंबई: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अस विधान त्यांनी केलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विधानानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण भाजप आमदार पडळकर यांच्यावर टीका करत आहेत. तसेच आंदोलनाची हाक सुद्धा दिली आहे. पडळकर यांनी शरद पवारांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे.
दरम्यान भाजप नेते निलेश राणे म्हणाले, मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किव्हा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ.