कोलोंबो – श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या काळात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या विभाजनवादी संघटनेकडून श्रीलंकेचे 2 ते 3 हजार सैनिक आपण ठार केले असल्याचा दावा “एलटीटीई’चा माजी म्होरक्या करुणा अम्मान याने केला अहे. या दाव्यातील तथ्य तपासण्याचे आदेश श्रीलंकेच्या पोलीस दलाला देण्यात आले आहेत. प्रभारी पोलीस प्रमुख चंदना विक्रेमराथे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला या संदर्भात तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
आगामी संसदीय निवडणूकांसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या एका प्रचार सभेमध्ये अम्मान उर्फ विनायगुरुमूर्ती मुरलिथरन याने आपण एलटीटीईच्या युद्धादरम्यान श्रीलंकेच्या 2,200 सैनिकांना ठार केले असल्याचा दावा केला होता. या सर्व सैनिकांची हत्या आपण एलिफंट पास जवळ एकाच रात्रीत केली होती. त्यापेक्षाही अधिक जणांची आपण किलिनोच्छीमध्ये हत्या केली होती. श्रीलंकेमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूपेक्षा ही संख्या निश्चितच जास्त आहे, असे अम्मानने म्हटले होते.
अम्मान हा एलटीटीईचा सर्वेसर्वा प्रभाकरनचा जवळचा सहकारी होता. 2004 मध्ये तो एलटीटीईमधून बाहेर पडला आणि नंतर त्याने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. तो एलटीटीईतून बाहेर पडल्याने ही संघटना कमकुवत झाली होती आणि 2009 मध्ये सरकारी फौजांनी या संघटनेचा पूर्ण पाडाव केला होता.
अम्मान नंतर माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पक्षातही सामील झाला आणि 2010 मध्ये तो उपमंत्रीही झाला होता. नंतर त्याने द्रवुडा महासभा पार्टी हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याचा पक्ष राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका पीपल्स पार्टीचा मित्र पक्ष असल्याचे समजते आहे. श्रीलंकेत दोनदा तहकूब झालेल्या संसदीय निवडणुका 5 ऑगस्टला होणार आहेत.