मुंबई – मुंबईतून गेल्या काही दिवसात करोना पॉझिटिव्ह असलेले सहा मृतदेह गायब झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी आणि किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत.
मुंबईत सध्या करोनाचा कहर आहे. मोठ्या संख्येने लोकांना याचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यावेळी सर्वात महत्वाचं म्हणजे करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेक मृतदेह गायब होत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर ते सापडतही आहेत. आतापर्यंत मुंबईतील विविध रुग्णालयातून 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याची यादी सोमय्यांनी सादर केली.
सोमय्यांच्या मते, राकेश वर्मा या 45 वर्षीय व्यक्तीचा जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेन्टर येथून मृतदेह गायब झाला होता. तर सुधाकर खाडे यांचा केईएम हॉस्पिटलमधून मृतदेह गायब झाला होता. नंतर तो शवागृहात सापडला.
याशिवाय जानकीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह सायन हॉस्पिटलमधून गायब झाला होता. तर मधुकर पवार यांचा मृतदेह नायर हॉस्पिटलमधून गायब झाला होता. विठ्ठल मुळे यांचाही मृतदेह गायब झाला होता. तो काल बोरिवली स्टेशनजवळ सापडला. तिकडे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाचा खून झाला आहे. त्याचाही मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमधून गायब झाला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला. रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय यानिमित्ताने मोठा प्रश्न हा आहे की, रुग्णालयातून हे आजोबा बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचलेच कसे?