सातारा (प्रतिनिधी) – शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकरी मजबूत राहिला तरच देशाचा, राज्याचा पर्यायाने तालुक्याचा विकास होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजना कशा पुरवल्या जातील यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे यांची कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने सातारा पंचायत समिती योग्य ती पावले उचलत आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा पंचायत समिती येथे 50 टक्के अनुदानावर संकरित, सुधारित बियाणे वाटप योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून संकरित सुधारित महाबीजचे सोयाबीन जेएएस 335 या जातीचे व भात इंद्रायणी या जातीचे 50 टक्के अनुदानावर सोयाबीन 100 शंभर बॅग 30 किलो ग्रॅमप्रमाणे व 25 बॅग भाताचे बियाणे 25 किलो ग्रॅम याप्रमाणे सातारा तालुक्यातील एकूण 125 लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. त्याचबरोबर पंचायत समितीच्या आवारात स्वयंचलित सॅनिटायझर मशीनच्या उद्घाटन प्रसंगी आ. शिवेंद्रसिहराजे भोसले बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय धुमाळ, पंचायत समितीचे सदस्य, कृषी अधिकारी गोळे, सौ.सोनावणे, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पंचायत समितीने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मी शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलो आहे. पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी यांनीही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून तळागाळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला आहे, याचे आपणास निश्चित समाधान आहे. सातारा तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नसून तालुक्यातील शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. भोसले यांनी केले.
सभापती सौ.सरिता इंदलकर म्हणाल्या, सातारा तालुक्यातील दुर्गम भागातपासून ते शहरी भागालगतच्या सर्व गावांमध्ये पंचायत समितीच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे याची कमतरता भासणार नाही याची काळजी प्रशासन निश्चितपणे घेत आहे. उपसभापती अरविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी आभार मानले.