प्रा. माणगावकर लिखित “शिवरायांचे प्रशासन व कल्याणकारी राज्य’ या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यनिर्मितीची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमी विशद केली आहे. हा ग्रंथ स्वरूप प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत शहाजीराजांचे शौर्य, पराक्रम, जिद्द, चिकाटी व स्वतंत्र बाणा या गुणांचा उपयोग झाला. शहाजीराजांनी संकल्प केलेले स्वराज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वप्नांची परिपूर्ती केली. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजेच त्यांचे मंत्रिमंडळ होते. हिंदवी स्वराज्यात गुण, कर्माला महत्त्व, सुखाचा घास लाभावा, जीवित आणि वित्त हमी मिळावी, यासाठी छत्रपतींनी केलेल्या कार्याचा मागोवा घेतलेला पाहावयास मिळतो. शिवरायांनी प्रशासनातील नेमणुका करताना जात, धर्म लक्षात न घेता त्यांची बौद्धिक आणि शारीरिक-मानसिक क्षमता विचारात घेतलेली पाहावयास मिळते.
“तहान लागली की विहीर खोदा’ ही आधुनिक काळातील जीवनपद्धती होऊ लागली आहे. त्याला शासन आणि प्रजा हे दोघेही जबाबदार ठरतात. याउलट शिवराय किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात जलव्यवस्थापन कसे कार्यक्षम राहील याकडे लक्ष घालीत होते. कोणत्याही कल्याणकारी राज्यात धर्म, जात, वंश, पंथ, भाषा किंवा संस्कृतीची इतर अंगे यावरून व्यक्ती-व्यक्तीत भेद केला नाही.
शिवरायांनी जमिनीची नव्याने मोजणी करून शेतकऱ्यांना न्याय देणारी शेतसाऱ्याची नवीन पद्धत सुरू केली. वतनदारांचे शेतकऱ्यावर होणारे अन्याय, वेठबिगारी, शेतकऱ्यांची होणारी लुटमार थांबावी म्हणून परंपरागत सुरू असणाऱ्या वतनदारीलाच सुरूंग लावला. राज्यात विहिरी, तलाव उपलब्ध करून शेतीला पाणीपुरवठा अधिक कसा होईल याची शिवरायांनी काळजी घेतली. लेखकाने शिवछत्रपतींचे औद्योगिक आणि व्यापारविषयक धोरण विचारात घेतले आहे. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच या परकीय शत्रूंचे सागरावर वर्चस्व होते. म्हणून त्यांनी मराठा आरमाराची स्थापना केली. आरमाराची निर्मिती करणारा 17 व्या शतकातील ते पहिले हिंदू राजा. शिवरायांनी जहाजबांधणीच्या उद्योगाला चालना दिली. त्यामुळे स्थानिक आदिवासी, वारली इत्यादी लोकांना रोजगार लाभला.
शिवरायांच्या किल्ल्यांचे बांधकाम, मार्ग, भौतिक रचना, विविध इमारती, त्याचे उपयोग, किल्ल्यांवरील विहिरी, तलाव, पाणवठे, तेथील वस्ती इत्यादीसंबंधी त्यांच्या कल्पकतेचे दर्शन घडते. शिवछत्रपतींच्या समता, स्वातंत्र्य, सर्वंकष पिळवणुकीस आळा, दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट, गुणवंतांचा सन्मान, पर्यावरणाचा समतोल राखणे, शिस्तबद्ध सैन्य, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण, प्रजा वात्सल्य, साधी जीवनपद्धती इत्यादी असंख्य गुणांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दर्शन घडविते आणि आजच्या राज्यकर्त्यांनी कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी “धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद’ कसा विकसित करावयाचा असतो हे शिवछत्रपतींच्या या जीवनकार्यातून शिकावे, असे लेखक सूचित करतात. त्याचप्रमाणे शिवरायांच्या अष्टपैलू गुणांचे जगातील अनेक इतिहासकारांनी, सम्राटांनी केलेले मूल्यमापन वेधक आहे, त्यांचा आवर्जून या ग्रंथात उल्लेख केलेला आहे.
– प्रतिनिधी