मुंबई : सध्या राज्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचादेखील अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. करोना काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही अपार मेहनत करत आहेत. दरम्यान, करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
केवळ डॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवाने जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवाने कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचे विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही, असे टोपे म्हणाले.
जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच करोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचे हे विमा कवच मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.