करोनाची धास्ती : “मासू’ संघटनेचे ऑनलाइन सर्वेक्षण
पुणे – राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या 88.2 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. परीक्षेला जाताना 93.1 टक्के विद्यार्थ्यांनी करोनाची लागण होईल, असे वाटत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.
विद्यापीठांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनतर्फे (मासू) ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आले. यात 32 हजार 378 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना विविध प्रश्न विचारून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला आहे. यूजीसीच्या परिपत्रकानुसार राज्य सरकारला परीक्षा रद्द करून ग्रेड देता येऊ शकते.
मात्र, तरीही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. करोनामुळे उद्भवलेली सध्याची स्थिती पाहता परीक्षा रद्द करणे महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थांची इच्छाही त्याप्रकारे असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना सादर केला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी पत्रकात सांगितले आहे. याच सर्वेक्षणातून 70 टक्के विद्यार्थ्यांनी करोनामुळे नोकरी जाणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.