प्रा. डी. के. वैद्य
अकोले -दोन महिन्यांहून अधिक काळ “लॉकडाऊन’ झालेला शेतकरी आता शेतमाल विक्रीसाठी स्वतःहून बाहेर पडू लागला आहे. आलेली आपत्ती ही इष्टापत्तीत रूपांतर करून बहुतेक शेतकऱ्यांनी “मोबाईल मार्केटिंगचा फंडा’ वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेतून बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थकारणाची सुखावह किरणे सावरू लागल्याचे सुखद चित्र पुढे येऊ लागले आहे.
तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी कोंडीत पकडला गेला होता. शेतकऱ्यांच्या घरचे देव कार्य, लग्नकार्य आणि आणि कौटुंबिक कार्य या सगळ्याच कामांवर करोनाने बोळा फिरवला होता. या काळात कोंडीत पकडल्या गेलेल्या शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल त्याने प्रसंगी शेतात जनावरे सोडून, नांगर घालून अथवा ट्रॅक्टर घालून आपला शेतमाल “फुका भावा’त विकण्यापेक्षा आपल्या शेतीत गाडून टाकला होता. डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले यांनी दीड एकर शेतीवर पाणी सोडले आणि उभे पीक ट्रॅक्टर खाली गाडून टाकले. प्रतिकात्मक हे चित्र गावोगाव निश्चितपणे दिसून आले.
नव्हे ती प्रत्येक गावाची कथा व व्यथा बनली होती. द्राक्षे, टोमॅटो, कलिंगड, मेथी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, कांदा, शेवगा, लसूण, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वाटाणा, वांगी, दोडका, गवार, आले, मेथी, पालक, कांदापात, अन्य भाजीपाला विक्री दृष्टीने शेतकऱ्यांच्या डोकेदुखीचा विषय बनला. किंबहुना दलालांची चांदी हा एरव्ही चर्चेचा विषय असतो. पण निसर्ग नावाच्या दलालाने या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आणि पर्यायाने हे भाजीपाला रुपी धन मोफत वाणवळ्याचे विषय बनले.
अलीकडे यातून शेतकरी सावरला आहे.
आपली सायकल, आपली दुचाकी किंवा आपले मजबूत पाय किंवा चारचाकी बाहेर काढून वा शहरी भागात जाऊन सध्या उत्पादक शेतकरी मोबाईल मार्केटिंग करीत आहे. अकोले, राजूर, कोतूळ, ब्राह्मणवाडा, गणोरे, देवठाण, समशेरपूर व अन्य मोठ्या लोकवस्तीच्या गावी हे शेतकरी आपला शेतमाल डोक्यावर किंवा वाहनावर घेऊन त्याठिकाणी जातात. मोठ्याने हळी देताना दिसत आहेत आणि ओघाने शेतमाल दरवाज्याशी आलेला आहे, हे पाहून ग्राहक सुद्धा माल खरेदीसाठी बाहेर येऊन कोणतीही घासाघीस न करता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये योग्य ते माप टाकणारे चित्र आढळून येत आहे.
पाव किलो, अर्धा किंवा, किलो शेतमाल विकण्याने त्याच्या डोक्यावरचे ओझे कमी करणारा हा “मोबाईल मार्केटिंग’चा फंडा सर्व ठिकाणी आता शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहे.कांद्याला दहा रुपये किलो, मेथीला दहा रुपये जुडी, कोथिंबीर दहा रुपये, टोमॅटो दहा रुपये, शेवगा पंधरा रुपये, हिरवी मिरची 15 रुपये, वाटाणा 15 रुपये पाव किलो व अन्य माल किलोच्या, पाव किलोच्या भावाने शेतकरी विक्री करताना आढळून येत आहेत. बहुतेक ठिकाणी शेतकऱ्याला तसा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यातही अनेकांनी करोनाचा धसका न घेता आपल्या शेतमालाला सुरक्षित असा भाजीपाला स्टॉल हा आपल्या घराच्या बाहेरच उभारला आहे. शेत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घराच्या पुढे भाजीपाला स्टॉल उभारून तेथेच भाज्या मांडून ग्राहकाच्या पदरामध्ये शेतमाल टाकणारा हाही एक नवीन व्यापाराचा फंडा शेतकरी वापर वापरताना दिसत आहे. किंबहुना शेतकऱ्याच्या घराचा अंगणाचा भाग शेतकऱ्याचा बांध हात खुबीने आता शेतकऱ्यांच्याच पदरामध्ये व्यापारी माप टाकताना आढळून येत आहे.
किंबहुना या मोबाईल मार्केटमुळेच वीरगाव येथील बाळासाहेब मुळे यांनी आपला टरबूज माल गावोगाव विकला. तर जवळेकडलगचे गोकुळ लांडगे, सुगाव बुद्रुकचे सुधाकरराव देशमुख आदींनी आपले द्राक्षे ग्राहकाच्या घरी थेट पोचवून आपल्या मालाला नक्कीच योग्य भाव मिळेल अशी पावले टाकली. टरबूज, द्राक्षे व आता पुढच्या टप्प्यामध्ये आंबा हा मोबाईल मार्केटिंगचा शेतकऱ्यांचा कौशल्याचा भाग ठरणार आहे हे नक्की.