देशातील करोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरू होत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना आणि मृत्यूचा आकडा तीन हजारापर्यंत येऊन पोहोचला असल्याने लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा विशेष महत्त्वाचा मानावा लागेल. आजपर्यंतच्या लॉकडाऊनच्या तीनही टप्प्यांमध्ये समाजातील सर्वच घटकांनी जर थोड्याफार प्रमाणात शिथिलता दाखवली असेल तर आजपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये अशाप्रकारची शिथिलता धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकते हे विसरून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात देशातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊनचा चौथा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण असेल, असे म्हटले असले तरी या कालावधीमध्ये कोणत्याही विशेष सवलती मिळतील असे समजून लोकांनी गाफील राहून चालणार नाही. साधारण दोन महिन्यांपूर्वी जेव्हा देशात करोना महासंकटाचा शिरकाव झाला तेव्हा लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये अनेकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नव्हता.
त्यामुळेच लॉकडाऊन कालावधीत दुसऱ्यांदा आणि नंतर तिसऱ्यांदा वाढवावा लागला आणि आता तर ही परिस्थिती अधिकच बिकट झाल्याने लॉकडाऊन कालावधी पुन्हा एकदा वाढवावा लागलेला आहे. या कालावधीमध्ये तरी समाजातील सर्व घटक गांभीर्याने सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करतील अशी आशा करायला हवी. कारण गेल्या दोन महिन्यांतील चित्र पाहता ते फारसे दिलासादायक नाही. सरकारने थोडी जरी सूट दिली तरी रस्त्यावर नागरिकांची जत्रा भरते आणि कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. खरे तर सर्व जीवनावश्यक वस्तू मिळण्यात कोणतीही अडचण नसतानाही सामान्य नागरिक विनाकारणच रस्त्यावर गर्दी करीत होते. दैनंदिन उपयोगाचे किराणा सामान, भाजीपाला आणि दूध यांचा पुरवठा व्यवस्थित आणि घरपोच होत असतानाही लोक रस्त्यावर का येत होते, हे समजत नव्हते.
त्यामुळेच आताची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये राज्या-राज्यांतून आणि जिल्ह्या-जिल्ह्यांतून स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने येत्या काही कालावधीमध्ये करोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढण्याची भीती आहे. सरकारने राज्यांमध्ये अडकलेले नागरिक आणि मजूर यांना आपापल्या राज्यांमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने आणि त्यासाठी काही सोय केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. ही गर्दी कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये आतापर्यंत ज्या प्रदेशात करोनाचा शिरकाव झालेला नव्हता तेथेही आता रुग्ण दिसू लागले आहेत. याचा गंभीर अर्थ लक्षात घ्यायला हवा. गोव्यासारख्या राज्यामध्ये गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये एकही रुग्ण नसताना आता गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तेथील संख्या दहा ते पंधरा झाली आहे, ही गोष्टही विसरून चालणार नाही.
अर्थात, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये फक्त समाजातील सामान्य नागरिकांनी आणि इतर घटकांनी गांभीर्याने वागण्याची गरज आहे, असे नव्हे तर प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांनीही गांभीर्याने आपले कर्तव्य बजावायला हवे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण पडला असल्याने काही प्रमाणात त्यांच्या कामामध्ये शिथिलता आली होती; पण आता ही शिथिलता परवडणारी नाही. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांनी आतापासूनच महानगरांमधील मैदाने, स्टेडियम, मोठ्या शाळा ताब्यात घेऊन तेथे करोना रुग्णालये उभारण्यासंदर्भात नियोजन केले असेल तर त्यांना आगामी संकटाची जाणीव आहे, असे म्हणावे लागते. पण ही जाणीव सामान्य नागरिकांपर्यंत गांभीर्याने पोहोचवण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या काही दिवसांत पावसाळी हंगामही सुरू होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यावेळी पावसाळी हंगामही चांगला होणार असल्याने त्याचा ताणही प्रशासनावर पडणार आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये पावसाळ्यात अवस्था किती बिकट होते हे गेली कित्येक वर्षे आपण पाहात आहोत.
एका मुसळधार पावसामध्ये मुंबई ठप्प होऊन जाते. त्यामुळे पावसाच्या या संकटाचा विचार करूनही प्रशासकीय यंत्रणेला तयार राहावे लागणार आहे. खरेतर वर्षाच्या या कालावधीमध्ये शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात होत असते आणि शैक्षणिक वर्ष सुरू होत असते, त्याच कालावधीमध्ये शैक्षणिक उपक्रमही बंद राहणार आहेत. त्याचा विचारही सरकारला करावा लागणार आहे. लॉकडाऊनच्या गेल्या टप्प्यामध्ये सरकारने काही प्रमाणात सवलत देऊन उद्योगांना आपले उत्पादन आणि सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. ती प्रक्रिया या कालावधीमध्येही सुरू राहण्याची शक्यता आहे; पण तरीही गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमधील विविध घटनांचा विचार करता लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा सर्वात महत्त्वाचा असल्याने सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पावसाळी हंगामामध्ये देशात जर करोना रुग्णांचा आकडा गुणाकार पद्धतीने वाढत गेला तर त्यावर नियंत्रण ठेवणे आणि उपचार करणे प्रशासकीय यंत्रणेला अवघड होणार आहे. याचा विचार करूनच समाजातील सर्व घटकांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. राज्या-राज्यांतून मजुरांचे आणि नागरिकांचे स्थलांतर आता पूर्ण झाले असेल तर या कालावधीमध्ये ती परवानगी मागे घेण्याची गरज आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, आता जर देशातील नागरिकांना लॉकडाऊनची सवय झाली असेल तर त्यांनी लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा. प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत सर्व नियोजन केले असल्याने आता विनाकारण घराबाहेर पडून करोना संक्रमणाला हातभार लावण्याची काहीच गरज नाही. 130 कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये आतापर्यंत गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये रुग्णांची संख्या फक्त एक लाख आहे, असे स्वतःला समजावून सांगणे म्हणजे धोका पत्करणे आहे. करोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे हीच काळाची गरज मानावी लागेल.