रेडा -मुंबईहून शिरसोडी गावात आलेल्या मायलेकींना करोनाची लागण झाल्याचे शनिवारी (दि. 16) स्पष्ट झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासन अलर्ट झाले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून तीन किलोमीटर परिसर सील केला आहे, अशी माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी दिली.
मुंबई येथील करोनाबाधित भागातून चार जणांचे कुटुंब गुरुवारी (दि.14) शिरसोडी या गावी आले होते. त्यांना एका शाळेत विलगीकरण केले व ते ज्या घरात सुरुवातीला राहिले होते, त्यावर तीन वेळा सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घशातील द्रावाचे नमुने घेतले. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून चारपैकी दोघे पॉझिटिव्ह, तर इतर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
शिरसोडी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असून तो पूर्णपणे लॉकडाऊन केला आहे. या झोनमध्ये असणाऱ्या वाड्या-वस्त्या व गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू दिले जाणार नाही. तर आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व्हेचे काम 46 पथके करीत आहेत. या प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी काम करणार आहे. ही पथके तब्बल 14 दिवस प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करणार आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे स्वॅब घेऊन त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. या गावातील बारीकसारीक आजारांच्या रुग्णांवरदेखील योग्य उपचार केले जातील, असे त्यांनी नमूद केले.
जे दोन रुग्ण सापडले आहेत ते मुंबईवरून आल्यानंतर त्यांना गावातील शाळेमध्ये वेगळे ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये कोणीही आलेले नाही, असे असले तरीदेखील या परिसरातील सर्व नागरिकांची योग्य तपासणी आरोग्य विभाग करणार आहे. तसेच हे रुग्ण मुंबईतून ज्या गाडीने आले, त्या गाडीच्या चालकाची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तातडीने करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कुटुंबाची व आपली काळजी घ्यावी आणि घरातच राहावे. करोनाग्रस्त रुग्णांची काळजी प्रशासन घेत आहे. जर बाहेरगावाहून कोणी आले तर त्याची माहिती तत्काळ प्रशासनाला द्या.
– दत्तात्रय भरणे, आमदार तथा राज्यमंत्री
इंदापूर तालुक्यातील कोणत्याही गावात बाहेरगावाहून नागरिक आले तर तत्काळ गावातील पोलीसपाटील आरोग्य यंत्रणा तसेच आम्हाला तत्काळ कळवा, कोणाही बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला थेट घरात घेऊ नका, त्या-त्या गावातील शाळेमध्ये 14 दिवस विलगीकरणाची तयारी केली आहे.
– सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर