करवीरचे प्रधानमंत्री, शिक्षणाधिकारी, दिवाणबहादूर आणि सत्यशोधक चळवळीचे सच्चे कार्यकर्ते असणाऱ्या अण्णासाहेब लठ्ठे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे 9 डिसेंबर 1879 रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए., एल.एल.बी.पर्यंत झाले होते.
समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक आहे हे त्यांनी जाणून शिक्षणाचा प्रसार केला. मात्र त्यांचे शिक्षणविषयक धोरण हे फक्त माणूस साक्षर झाला पाहिजे एवढ्यावर न थांबता शिक्षणातील सर्व दारे समाजासाठी उघडी राहावीत असे होते. विशेष करून इंग्रजी शिक्षण बहुजन समाजाने घ्यावे असे त्यांचे आग्रही मत होते. त्यांनी काही काळ कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापनही केले होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टी जोपासणे, स्त्री-शिक्षणास प्रोत्साहन, वसतिगृहांची निर्मिती आणि धर्मशिक्षण यांसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी इंग्रजी-मराठीतून अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक विषयांवर लेखन केले. त्यांनी 1924 मध्ये छ. शाहू महाराजांचे इंग्रजी भाषेतून चरित्रही लिहिले.
खेडेगावातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जैन वसतिगृह स्थापनेमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्यामुळे कोल्हापूरनंतर बेळगाव, हुबळी व सांगली येथे जैन बोर्डिंग स्कूल सुरू करण्यात आल्या. वर्ष 1908 मध्ये कोल्हापूर येथे व 1922 साली सांगली येथे श्राविकाश्रम (मुलींचे वसतिगृह) सुरू केले. 2 जानेवारी, 1926 रोजी कोल्हापूर संस्थानचे दिवाण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर प्रशासकीय कामाबरोबर संस्थान व कोल्हापूरनगरीच्या विकासाच्या योजना राबविल्या. “कोल्हापूर स्टेट म्युनिसिपल ऍक्ट (1925)’ लागू केला तसेच कार्यालयीन कामात शिस्त आणली. वर्ष 1926 मध्ये इलाखा पंचायतीचा कायदा करून लोकांना स्थानिक कारभारामध्ये सहभागी करून घेण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायदा संस्थानमध्ये लागू केला गेला.
राजाराम कॉलेज व राजाराम हायस्कूल कोल्हापूर संस्थानच्या अधिपत्याखाली आणले. 1925 ते 30च्या दरम्यान कोल्हापूर शहरातील रस्ते रुंदीकरणाचा पहिला मोठा प्रयत्न त्यांनी केला. अनेक नवे रस्ते तयार केले. त्यांनी सुधारणांबरोबरच लोकोपयोगी कामे केली. जहांगीरदारांवर वचक बसवून त्यांना कोल्हापूर संस्थानचे अधिपत्याखाली आणले. कोल्हापूर बॅंकेची स्थापना, राजारामपुरी व लक्ष्मीपुरी वसाहतीची निर्मिती तसेच लेडी विल्सन पूल, राजाराम तलाव, पाणीपुरवठा योजना अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली.
त्यांनी तत्कालीन दिल्ली कायदे कौन्सिलचे सदस्यपदही भूषविले होते. तत्कालीन मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळात अर्थ व शिक्षण मंत्रिपदही भूषविले होते. 16 मे 1950 रोजी त्यांचे निधन झाले. वर्ष 1951 मध्ये अण्णासाहेब लठ्ठे एज्युकेशन संस्थेची स्थापना झाली.
– माधव विद्वांस