कराड -करोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या काही सूचनांचा समावेश केंद्रीय सरकारच्या विशेष पॅकेजमधून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनातील दांडगा अनुभव असणाऱ्या खा. पाटील यांच्याकडील दूरदृष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून त्या सूचना किती योग्य होत्या, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच करोना संसर्गाबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात आढावा बैठक झाली. या बैठकीत खा. श्रीनिवास पाटील यांनी काही महत्वाच्या सूचना मांडल्या होत्या. यामध्ये ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाहीत किंवा या परिस्थितीत इतर ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. त्यासाठी रेशनकार्डची पोर्टेब्लीटी करून त्या माध्यमातून तशी सुविधा करून देण्यात यावी.
याशिवाय मनरेगाचे लोक परत जाण्याच्या मानसिकतेत नसतील तर त्यांच्यासाठी विकासाची कामे काढावीत. जे लोक बेरोजगार झाले आहेत त्या मजुरांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या योजनांचा कसा फायदा होणार याची माहिती दिली. यामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात येईल. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी काही योजना घेऊन आलोय.
त्यांच्यापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये खा. श्रीनिवास पाटील यांनी सूचवलेल्या काही सूचनांचा समावेश झाला आहे. दोन दिवसांपूर्वी खा. पाटील यांनी केलेल्या सूचना केवळ योगायोग नसून त्यांच्याकडे असलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अनुभव या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आला आहे.