नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 27 पूर्णांक 41 शतांश टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता 12 दिवसांपर्यंत वाढला आहे. देशभरात आज सकाळपासून 278 नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आले.
त्यामुळे देशात आता करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 46 हजार 711 झाली आहे. आज 15 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून देशात या विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 583 झाली आहे. 13 हजार 161 रूग्णांना उपचारानंतर रूग्णालयातून सोडले असल्याचे आरोग्य विभागाने वेबसाइटवर जाहीर केले आहे.
काल दिवसभरात सुमारे 4 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र काही राज्य रुग्णांची माहिती वेळेत देत नव्हते. आता ही समस्या दूर करण्यात आली असल्याने अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाढ दिसून आली असे अग्रवाल यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज 11 नवे रुग्ण आढळून आले असून 6 जणांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांमधले 4 मुंबई पोलिसात आहेत.
2 जण मुंबईतल्या खासगी रुग्णालयात कामाला आहेत तर 2 जण वाशीच्या बाजार समितीमध्ये कामाला आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेनं ही माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रातल्या एकूण रुग्णांची संख्या 224 झाली असून त्यापैकी 147 जणांवर उपचार सुरू आहेत.