संयुक्त राष्ट्र : भारतातील नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचारासारख्या आपत्तींमुळे 2019 या एकाच वर्षात तब्बल 50 लाख नागरिक देशांतर्गत अन्यत्र विस्थापित झाले आहेत. देशांतर्गत विस्थापित होणाऱ्यांची एक वर्षातील सर्वात जास्तीची आकडेवारी फिलीपाईन्स, बांगलादेश आणि चीनमधील आहे. त्यापाठोपाठ भारतात सर्वाधिक जास्त विस्थापित झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे.
2019 साली 3 कोटी 30 लाख नागरिकांचे विस्थापन झाले. त्यापैकी 2 कोटी 50 लाख नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीमुळे तर 85 लाख नगरिकांनी संघर्ष आणि हिंसाचारामुळे अन्यत्र विस्थापन केले असल्याचे “युनिसेफ’च्या “द लॉस्ट ऍड होम’या अहवालामध्ये म्हटले आहे. या विस्थापितांमध्ये 1 कोटी 20 लाख विस्थापितांमध्ये मुलांचा समावेश आहे.
त्यातही 38 लाख जणांनी संघर्ष आणि हिंसाचारामुळे आणि 82 लाख जणांनी नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापन केले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. संघर्ष आणि हिंसाचारापेक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2019 मध्ये पूर्व आशियात आणि प्रशांत क्षेत्रात जवळपास 1 कोटी नागरिकांनी तर दक्षिण आशियात साधारण तेवढ्याच प्रमाणात नागरिकांनी विस्थापन केले.
भारत, फिलीपाईन्स, बांगलादेश आणि चीनमध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण लक्षणीय राहिले. त्यामुळे जगातील एकूण विस्थापितांपैकी 69 टक्के विस्थापन याच देशांमध्ये झाले आहे. या देशांमध्ये पूर, वादळ आणि दुष्काळासारख्या आपत्तींमुळे विस्थापन झाले. भारतात 2019 या एकाच वर्सात 50,37,000 नागरिकांनी विस्थापन केले. त्यातील 50,18,000 जणांनी नैसर्गिक आपत्तीमुळे तर केवळ 19 हजार जणांनी संघर्षामुळे विस्थापन केले आहे.