केंदूर – करोना विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाला मोठी खीळ बसली आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ, त्यांनर अवकाळी पाऊस या दुहेरी कात्रीत अडकलेला शेतकरी आता पुन्हा करोनाच्या विळख्यात सापडला आहे. दोन वर्षांत तिहेरी संकट शेतकऱ्यांवर आदळल्यामुळे शेतकरी पुरता खिळखिळा झाला आहे.
अगोदरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी उत्पादन घटल्याने कंबरडे मोडले असताना कांद्याच्या पिकात नुकसान भरून निघेल, अशी भोळीभाबडी अपेक्षा होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका बसल्याने शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल शेतात खराब होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे.
फुलांचे मळेच्या मळे तर मातीतच गेले आहेत. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गवार, भेंडी, कलिंगड, मिरची, वांगी आदी पिके जनावरांना खायला घालताना शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. फळबागा देखील वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली आहे. दोन वर्षे दुष्काळ, यावर्षीचा अवकाळी पाऊस अशा अनेक संकटामध्ये अडकलेला शेतकरी आता करोनाच्या संकटात पुरता घायाळ झाला आहे.
दरम्यान, अगोदरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, पुढच्या पिकाची तजवीज करण्यासाठी शेतकरी पुन्हा धैर्याने उभा राहत आहे. नव्याने खरीप हंगामासाठी धडपडत आहे. मात्र, शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमानच्या कालव्याचे पाणी डोळ्यांना दिसत असताना देखील शेतीला पाणी मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गेल्या दोन आठवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामी पीक कसं वाचवायचं, हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अगोदरच वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यात रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यायाने निकामी रोहित्र लॉकडाऊनमुळे वेळेत दुरुस्त करून मिळत नाहीत. त्यात महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
याच कारणामुळे दोन दिवसांपूर्वी करंदीमध्ये महावितरणच्या कर्मचारी आणि दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला होता. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या संकटात देखील शेतकरीच भरडला जातोय. आता याला करोनाही अपवाद नाही.