पालघर : जिल्ह्यातील गडचिंचले गावात तीन साधूंच्या १६ मार्च रोजी झालेल्या हत्याकांडामुळे ठाकरे सरकारवर टीका होत आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून, आरोपीना कठोर शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सरकारने या प्रकरणाची दाखल घेऊन ११० आरोपीना अटक केली आहे. तसेच सदरील प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविला आहे. सीआयडीकडे तपास दिल्यानंतर कोकण विभागाच्या आयजींनी सीआयडी पथकासह घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली. घटनेतील सुमारे ३०० पेक्षा जास्त आरोपी फरार असून काही आरोपी जंगलात लपून बसले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ४ ड्रोन कॅमेऱ्याद्वारे जंगलात शोधमोहीम सुरु केली आहे.
दरम्यान, या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोपीना कठोर शिक्षा करण्यात येईल असं सांगितलं आहे. तसेच हा प्रकार गैरसमजातीमधून घडल्याचे ते म्हणाले. गावात काही दिवसापासून चोर असल्याची अफवा पसरवली होती. घटनेतील ११०आरोपीना अटक करण्यात आली असून ९ अल्पवयीन आरोपीना बालसुधार गृहात पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.