गेल्या काही दिवसांत वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर होत आहेत. निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर नजरेस पडणाऱ्या दूरवरच्या सुंदर पर्वतरांगा, खळाळत्या नद्यांमधलं नितळ स्वच्छ पाणी, आणि मंजुळ साद घालत दर्शन देणारे पक्षीगण. जगातली जवळपास निम्मी लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये घरात बसून आहे, काही मोजके कारखाने सोडून अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत, वाहनांची वर्दळ नाही, की माणसांचा गोंगाट नाही. साहजिकच हवा, पाणी, आणि आवाजाचं प्रदूषण लक्षणीयरीत्या घटलं आहे. हवेचा दर्जा उंचावल्यावर श्वसनाचे आजार असणाऱ्या कित्येकांना थोडा आराम वाटतो आहे. तर ध्वनीप्रदूषण कमी झाल्याने मुलं आणि ज्येष्ठ नागरिक थोडे सुखावले आहेत.
याही पुढे जाऊन काही संशोधक या मिळालेल्या संधीचा फायदा करून घेत आहेत. उशिरापर्यंत सुरू असणारी अनेक ऑफिसेस वा कारखाने बंद आहेत. कुठेही रोषणाई नाही. त्यामुळे दिव्यांचा कृत्रिम झगमगाटी प्रकाश कमी झाला आहे. या घटलेल्या प्रकाश प्रदूषणासोबत हवाही स्वच्छ आहे. साहजिकच या काळात दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) वाढून रात्री आकाशनिरीक्षण अधिक चांगलं होत आहे. बरेच ग्रहतारे दीडपट तेजस्वी दिसत आहेत याबाबत अनेक हौशी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. सात एप्रिलचा पिंक सुपरमून देदीप्यमान दिसला होता, आणि एप्रिलमध्ये एकूण नऊ उल्कावर्षाव होणार आहेत यांचंही या निरीक्षकांना आकर्षण आहे. आपणही दुर्बिणीशिवाय वेगवेगळे तारकासमूह आणि शनी, मंगळ, आणि गुरूसारखे ग्रह स्पष्ट पाहू शकतो आहोत.
या व्यतिरिक्त सहसा आपल्या लक्षात न येणारं आणखी एक प्रदूषण करोनाच्या काळात कमी झालं आहे. रस्ते, महामार्ग सुने आहेत. ट्रेन्स जागीच उभ्या आहेत. विमानांचं उड्डाण थंडावलं आहे. माणसांची लगबग कमी झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत होत असणारे आघात बऱ्याच अंशी कमी झाले आहेत. एका परीने जमिनी शांत, नीरव झाल्या आहेत, विशेषत: शहरी भागातल्या जमिनी.
हा सतत जाणवणारा कंप म्हणजे भूगर्भाचा आणि भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी एक प्रकारचं प्रदूषण असतं. त्यांच्या अभ्यासात यामुळे थोडा अडथळा येत असतो. अर्थात हे कंपप्रदूषण सहन करण्यावाचून त्यांना पर्याय नसतो. ते कधी कमी होईल अशी त्यांची अपेक्षादेखील नसते. मात्र आता जगभर पसरलेल्या करोनाच्या महामारीत नीरव भूपृष्ठ हा त्यांना एक सुखद धक्का आहे.
पहिल्यांदा ही बाब लक्षात आली ती बेल्जियममधल्या एका भूकंपशास्त्रज्ञाच्या नोंदींमध्ये. मग इतर शहरांमधल्या अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिला. या नव्या परिस्थितीत कंपप्रदूषण सुमारे पन्नास टक्के घटलेलं आहे, आणि म्हणूनच या संशोधकांना अगदी छोटे भूकंप व्यवस्थित टिपता येत आहेत.
प्रदूषण थोडं कमी झाल्यावर काय होतं याची ही एक झलक. सोबत माणूस सतत सकारात्मक बाजू बघत असतो हेसुद्धा यातून लक्षात घेण्यासारखं!