नवा विचार… नवा हुंकार…
पहाटेच्या मंद मंद गारव्याबरोबर एक सुगंधी परिचित दरवळही श्वासातून देहभर पसरला अन् झोप चाळवली पण त्या दरवळाने मन मात्र उल्हासीत झाले. वसंतातल्या या दरवळाने स्मृतिपटलावर अनेक गोष्टी अलगद आणून ठेवल्या.होय! अंगणातल्या कडुनिंबाच्या मोहराचा चित्त प्रसन्न करणारा श्वास – मन भरून जाणारा सुगन्ध बालपणीच्या अनेक कोवळ्या आठवणींना पालवी फोडून पुलकित करून गेला.
लहानपणी पाडवा आला की आम्ही पाटी-पूजनाच्या तयारीला लागायचो. पाडव्याला शाळेत पाटीपूजन असायचे. त्यासाठी पाटी सजवण्याचा तो एक दिव्य सोहळाच होता जणू! आमच्या पाट्या खापराच्या – लाकडी चौकटीच्या – कुणाच्या पत्र्याच्या पण असायच्या; पण त्याचे टवके उडून अक्षरे दिसायची नाहीत म्हणून मग खापरी पाटीच सर्वमान्य! पण ही अखंड पाटी क्वचितच असायची कारण मुली वर्गात खेळताना दप्तरावर पाय पडायचे अन पाटीला मधोमध तडा जायचा. बऱ्याचदा चौकट सैल पडून पाटीचे दोन तुकडे व्हायचे एक मोठा एक छोटा! त्यातला एक घरी ठेऊन एकाचा वापर व्हायचा ! तर अशा या पाटीला पाटीपूजनासाठी सजवणे ही एक बाल जीवनातील आनंददायी गोष्ट होती.
पाडव्याच्या आदल्या दिवशी शाळा सुटली की चुलीच्या राखेतला किंवा बाहेर टाकलेल्या राखेतला एक कोळशाचा तुकडा आणून पाटी स्वच्छ घासून गुळगुळीत करायची धुवून स्वच्छ पुसायची. चौकटीला ब्लेडने घासून काळपटपणा काढून नव्यासारखी करायची. यानंतर पूजेसाठी फुले शोधण्याची मोहीम!
तेव्हा घरोघरी पाण्याची सोय नव्हती. सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागायचे त्यात पण लाईट नसली की पाणी यायचे नाही.
कधी कधी पाण्याची पातळी खाली जायची किंवा पाईपला काही प्रॉब्लेम यायचा. मग चार-चार दिवस पाणी सुटायचे नाही. त्यामुळे कुणाच्या दारात फुले फुललेली नसत. क्वचित कुणाच्या दारी कण्हेर, मिर्चीफूल असायचे किंवा कागदीफूल! ज्यांच्या दारात झाड असेल तिथं जाऊन, “ओ आमाला फूलं द्या की,” म्हणून विनवणी करायची. पण कितीही विनवणी केली तरी चुकूनच एखादे फूल मिळायचे; अन्यथा हाकलूनच लावायचे.
गल्लीच्या कोपऱ्यावर चाफ्याचे एक झाड होते त्या जागामालकांचा मुलगा चाफ्याला राखतच बसायचा. कारण खाली पडलेली फुले मिळायची पण पानांचं काय? ती पण लागायची पूजनाला! मग त्याला गोड बोलून मिनत्या करायच्या, “आण्णा दे की पान!” आण्णा उंच वाकड्या पसरलेल्या फांद्यावर चढून पानं तोडून खाली टाकायचा न आम्ही ती गोळा करून घ्यायचो!
अशाप्रकारे पाने फुले गोळा झाली की, पाटीवर मधोमध 4 काढून त्याला खाली तिरप्या ///// रेषा मारून प्रत्येक 4 च्या मागे रफार ((((((( काढून सरस्वती रेखाटायचो व पाटी लांब ठेऊन द्यायचो. सकाळी घरी गुढी उभारायची लगबग असायची. आम्ही गणवेश घालून पाटीवर गूळ खोबरे, पाच पैसे, सुपारी विड्याची पाने ठेवायची. हळदकुंकू वहायचे, त्यावर पाने-फुले ठेवायची. उदबत्ती ठेवायची व दोन्ही हातात पाटी धरून शाळेत जायचो. शाळेत नवीन प्रवेश नारळ सव्वा-रुपया देऊन त्याच दिवशी व्हायचे. शाळेत गेले की, गुरुजी सर्वांच्या पाटीला उदबत्ती ओवाळायला सांगायचे व सर्व पाट्या एकत्रित गुरुजींकडे द्यायच्या. पाटीवरील गूळ खोबरे एकत्र करायचे, पैसे एकत्र करायचे, सरस्वतीला नमस्कार करून पाटीला नमस्कार करायचा व घरी जायचे.
पाटीपूजन करून घरी आल्यानंतरची सर्वात आनंदाची गोष्ट की दूध, गूळ शेवया खायला मिळायच्या. खूप आवडायच्या मला! एरवी वर्षभर नाश्ता किंवा शेवया क्वचितच मिळत. घरी पाहुणे आले की त्यांच्यासोबत कधीतरी दूध शेवया मिळायच्या! पण पाडव्याला हमखास! तर असा हा वर्षाच्या सुरुवातीचा आनंददायी दिवस मन:पटलावर कायमचा कोरलेला !
दिवस हलाखीचे असले तरी आनंददायी होते. काही नसण्याचे दुःख नव्हते, मने आशादायी होती. मोठी माणसे सांगायची, ‘हे दिवस संपतील.’ आनंदाच्या वाटा हजार होत्या, पोटभर अन्न नव्हते मिळत तरीही चेहऱ्यावर तेज होते समाधानाचे अन् कष्टाचे! आज पाटी शाळेतून हद्दपार झाली अन् पूजन अंधश्रद्धेत! त्यामुळं बालपणीचा तो एक मजेदार सोहळा भूतकाळातच राहिला. एक मजेदार आनंदाच्या आठवणींच्या साठवणीत भिशीतल्या त्या न चालणाऱ्या नाण्यांप्रमाणे…