परिंचे (वार्ताहर) – वीर येथील एका शेतकऱ्यास शेतात काम करताना जोरात आवाज आल्यानंतर त्यांना बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर वस्तीकडे पळ काढला. या घटनेबद्दल ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाने पायांच्या ठशांची पाहणी करून हे ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वीर येथील शेतकरी मारूती समगीर यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला.
शेळीवर हल्ला झाल्यानंतर लोकांनी लाडंगा असेल, असे पहिल्यांदा त्यांना वाटले. परंतु रविवारी पहाटे शेतकरी किरण समगीर याने पुन्हा बिबट्याला पाहिले. ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, वनपाल महादेव सस्ते, वनरक्षक गणेश तांबे, वनरक्षक योगेश शितोळे, सासवड वनपाल शितल बागल, परिंचे दूरक्षेत्र येथील पोलीस हवालदार अनिल खोमणे पोलीस नाईक अविनाश निगडे, सरपंच माऊली वचकल, अमोल चौरे, संदीप कांचन, मारुती समगीर, किरण समगीर यावेळी दाखल झाले.
यावेळी तेथील ठशांची पाहणी केली असता हे बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात बिबट्या वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वीर याठिकाणी शेतानजीक असलेल्या गोठ्यामध्ये शेळीवर हल्ला केला. याठिकाणी ठशांची पाहणी केली असता ठसे बिबट्याचे असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी दक्षता म्हणून याठिकाणी दोन वनरक्षक ठेवलेले आहेत. गरज वाटल्यास आपण पिंजरा लावून ठेऊ, असे अधिकारी जयश्री जगताप यांनी सांगितले.