माधव विद्वांस
आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म पुणे येथे 20 मे 1850 रोजी झाला. मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून ते 1872 मध्ये उत्तीर्ण झाले.वर्ष 1872 ते 1879 या कालावधीमध्ये पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. विष्णुशास्त्रींचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृततज्ज्ञ, इंग्रजी साहित्याचे जाणकार तसेच लेखक असल्यामुळे विष्णुशास्त्रींनाही लेखन-वाचनाची गोडी लागली.
“शालापत्रक’ हे त्यांच्या वडिलांनी चालविलेल्या मासिकातून विष्णुशास्त्रींनी वर्ष 1868 मध्ये लेखन सुरू केले. काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले. तथापि त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीका व स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान यामुळे “शालापत्रक’ वर्ष 1875 मध्ये बंद करावे लागले. वर्ष 1874 मध्ये सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी “निबंधमाला’ हे मासिक सुरू केले. त्याबरोबरच वर्ष 1878 मध्ये ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने “काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक सुरू केले.
स्थानिक लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे लेखकांना प्रोत्साहन देणे व आपल्या इतिहासाची ओळख करून देणं हा त्यांचा उद्देश होता. निबंधमाला हे विष्णुशास्त्रींचे प्रमुख उल्लेखनीय संपादकीय कार्य. निबंधमालेचे त्यांनी 7 वर्षे संपादन केले व त्या कालावधीत 84 अंक प्रकाशित केले तसेच अनेक विषयांवरील अनेक लेखकांचे निबंध प्रसिद्ध करून मराठी निबंधाला सामर्थ्य दिले. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्रींनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते.
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या “रासेलस’ ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्रींनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले.ह्याच मासिकातून त्यांनी प्रथमच कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले व त्यांची ओळख तत्कालीन नवीन पिढीला दिली ते पुढे “संस्कृत कविपंचक’ ह्या नावाने प्रसिद्ध केले. त्यामुळे प्राचीन कवींचा काळ, कविता आणि कला यांची माहिती लोकांना झाली.
वर्ष 1880 मध्ये नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात “न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा व फर्गसन महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच त्याच वर्षी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी दोन वृत्तपत्रे “केसरी’ हे मराठी आणि “मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना यांची निर्मिती केली तसेच किताबखाना हे पुस्तक विक्रीचे दुकानही चालू केले.
मुद्रण तंत्र भारतात आल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग विष्णुशास्त्री यांनी करून घेतला व त्यामुळे मुद्रण व्यवसायासही चालना मिळाली.त्यामुळेच वाचन व लेखन संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली असे म्हणणे उचित होईल. 17 मार्च 1882 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.