अरुण गोखले
नारदीय भक्तिसूत्रात नवविधा भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितलेले आहेत त्यातील कीर्तन हा एक श्रेष्ठ असा भक्ती प्रकार आहे. ईश्वराचे गुणगान करणे, त्याच्या कार्याची माहिती लोकांना सांगणे. लोकांना सद्भक्ती, सदाचरण, ईश्वरनिष्ठा, समर्पणभाव ह्याची ओळख करून देणे, हेच ह्या कीर्तन माध्यमाचे मुख्य उद्दिष्ट असते.
कीर्तन परंपराही नारदमुनींपासूनच चालत आलेली आहे. त्यामुळेच कीर्तन सेवा ही नारदीय गादी चालविण्याची सेवा आहे, हा भाव कीर्तनकारांच्या मनात असतो आणि तो तसाच असायला हवा.
कीर्तनकाराकडे उत्तम आवाज, गायनाचे कौशल्य, शुद्ध वाणी, स्पष्ट उच्चार, स्पष्टवक्तेपणा सुंदर दाखले देण्याची हातोटी, हे गुण असावे लागतात. तो अभ्यासू चिकित्सक, विवेकी विचारी, बहुश्रुत, मार्मिक विनोद करण्याची कला अवगत असणारा असा असावा लागतो. यापैकी काही गुण हे उपजत असतात तर काहींनी ते प्रयत्नपूर्वक, अभ्यासाने आत्मसात केलेले असतात.
कीर्तन सादर करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. त्याचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात. पूूर्वरंग हा एखाद्या अभंगाच्या आधाराने सुरू केला जातो. तर कीर्तनाच्या उत्तररंगात एखादे श्रवणीय कथानक, उत्तम दाखले, उदाहरणे इ. देऊन सादर केले जाते. पुन्हा कीर्तनकार आपले निवेदन पूर्वरंगातील अभंगावर आणून भैरवीच्या सादरीकरणाने कीर्तनाची सांगता करतात.
कीर्तन ही एक कला असून ती शिकविणाऱ्या संस्था सध्या निर्माण झाल्या आहेत. आज वेगवेगळ्या गावातले नामांकित कीर्तनकार हे आपापल्या गावात खास आमंत्रित करून सण उत्सवाच्या निमित्याने मोठ मोठे कीर्तनमहोत्सव घडून आणले जात आहेत. एक स्वतंत्र व्यासपीठ कीर्तनकारांना उपलब्ध करून दिले जात आहे. नामांकित कीर्तनकारांचे जाहीर सत्कार करून विविध वारकरी संस्था, ज्ञानदान केंद्रे, शासन ह्यांच्यावतीने ही कला समाजात जोपासून तिच्या वृद्धीचे प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत.
सध्याच्या बदलत्या काळाचा विचार करून ह्या कलेचा समाज प्रबोधनासाठी आणि लोकजागृतीसाठी, उपयोग करून त्याद्वारे, पर्यावरण, स्त्री भृणहत्या, आरोग्य, साक्षरता, स्त्रीचा सन्मान या सारख्या सध्य विषयावरही कीर्तन करून हे एका वेगळ्या दिशेने पाऊल उचलले जात आहे तीसुद्धा कौतुकाचीच बाब आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी।।
हेच त्या कीर्तनसेवेचे मूळ सूत्र आहे. नामसंकीर्तन हे सध्याच्या कलियुगातले ईश्वर भक्तीचे उत्तम असे साधन आहे.