नगरसेवक बाबर : पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्णत्वाकडे
कोंढवा : कोंढवा खुर्द- मिठानगर प्रभाग क्र.27 मध्ये बारमाही पाणीटंचाई भासत होती, या भागाचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून 35 लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्णत्वास आणले आहे. त्यामुळे लवकरच कोंढवा परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.
कोंढवा खुर्द शिवनेरीनगर स.नं.60 येथे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून जमिनीवर एक व जमिनीखाली एक अशा दोन टाक्या 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आल्या आहेत. एका टाकीत 35 लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. या पाण्याच्या टाक्यांमुळे शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, मिठानगर, साईबाबानगर व अन्य उंचवट्यावरील भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोंढवा गावठाण परिसराला पाण्याची नेहमीच कमतरता भासत आली आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नव्हते. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला मूलभूत सोयीसुविधा वेळीच मिळायला हव्यात हे धोरण मनसेचे आहे त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करून त्यांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला जातोय, असे साईनाथ बाबर यांनी सांगितले.