महाराष्ट्रात मराठीची परिस्थिती सध्या फारशी बरी नाही. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सारखी शहरे आणि प्रामुख्याने मुंबईत मराठीला पर्याय म्हणून हिंदी भाषा सर्रास वापरली जात आहे. अनेकदा समोरच्याला मराठी कळत असूनही त्याला मराठी कळत नसावी असा समज करून आपण त्याच्याशी हिंदीत बोलतोय. यामध्ये किराणा दुकानदार, रिक्षावाले, टॅक्सीवाले, भाजीवाले, झाडून काढणारे, कचरा उचलणारे, दूधवाले, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वॉचमन, पेपरवाले, फूड डिलीव्हरीवाले यांचा समावेश आहे.
या लोकांशी संवादाला सुरुवातच आपण हिंदीत करतोय? का? कशासाठी? त्याला मराठी समजत असूनही आपण का मराठीत बोलत नाही? परवा मुंबईहून परत येताना या सगळ्यांच्या वर अजून एक वर्ग सापडला. खालापूर टोल नाक्यावर टोल घ्यायला हिंदीभाषिक मुलं आहेत. त्यांना हिंदी सोडून इतर भाषा समजत नाही आणि ते ‘हिंदी मे बात करो’ असे म्हणायला मागेपुढे पहात नाहीत. आबांनी (मुंबईला जाणे येणे नेहमी आबांच्या गाडीत होते.) हिंदीत बोलायला नकार दिला आणि मराठीतच बोलत त्याच्या मॅनेजरला बोलावून घेतले.ही हिंदीभाषिक पोरं तुमच्या नोकऱ्या घ्यायला लागलीत असं आबांनी म्हटल्यावर तो मॅनेजर थोडा ओशाळला.
“आम्ही तरी काय करणार?” म्हणत आमची गाडी पुढे सोडली.
हे तेवढ्यावर संपलं तरी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजमितीला स्टार स्पोर्ट्ससारखी वाहिनी तेलगू, कन्नड, तमिळ, बंगाली, मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. अनेकदा मागणी करून, ट्विटर वर प्रश्न विचारून, प्रसंगी टीका करून गेल्यावर्षी त्यांनी मराठी स्टार स्पोर्ट्स सुरू करणार असल्याची घोषणा केली. मात्र ती घोषणाच राहिली. ही वाहिनी कुठल्याही डिश सुविधा पुरविणाऱ्या कंपनीकडे उपलब्ध नाही. स्टार स्पोर्ट्स ला प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. असे का होते? कारण आपणच हिंदी आणि इंग्रजी वाहिन्या आहेत म्हणून मराठीची मागणी करत नाही. दक्षिणेत तसे नाही हे सर्वज्ञात आहे.
सुनंदन लेलेंसारखे क्रीडा पत्रकार आजही कुठल्याही देशात असले तरी रहाणे, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंना मुद्दाम मराठीतून प्रश्न विचारत मराठीतूनच उत्तरही द्यायचा आग्रह करतात. यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे.सुबोध भावेसारखे आघाडीचे कलाकारसुद्धा मराठीचा आग्रह धरतात. याबद्दल त्यांचेही कौतुक आहे.
परवा एक मित्र कोथरूडमधल्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये गेला. तिथे भाषांच्या पर्यायात गुजराती, हिंदी आणि इंग्रजी असे पर्याय होते.मराठी हा पर्यायच नाही. मित्राने रीतसर तक्रार करून त्या एटीएमवर मराठी भाषेचा पर्याय येईल याची खात्री करून घेतली. मराठी भाषेची शेखी मिळविणाऱ्या पुण्यात ही परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी काय असेल?
गुगलसारखी आघाडीची कंपनी आपली अनेक उत्पादने आता मराठीत घेऊन येत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी गुगलने मराठीआधी तेलगू, तमिळ, बंगाली आणि हिंदी या भाषांना पसंती दिली यावरून त्यांच्या लेखी मराठीचे महत्व असले तरी ते कमी आहे हे अधोरेखित होते. गुगल सर्च संमेलनसारखे उपक्रम राबवून ही कंपनी मराठी आणि इतर भाषांमध्ये कंटेंट क्रिएटर्सला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे.
गुगल अॅडसेन्स अनेकांना माहीत असेल. या उत्पादनाद्वारे गुगल तुमच्या वेबसाईटवर काही जाहिराती दाखवते. तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांनी या जाहिरातींवर लोकांनी क्लिक केले की तुम्हाला पैसे मिळतात असा साधा फंडा. सुरुवातीला हे उत्पादन भारतात फक्त इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध करून दिले होते. याला कारण काय? तर या भाषांमध्ये मराठीच्या तुलनेत अधिक कंटेंट क्रिएशन होते. आता कुठे गेल्या काही महिन्यांत अॅडसेन्स मराठी भाषेसाठीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
म्हणूनच मराठीमध्ये कंटेंट क्रिएशनची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मराठी भाषकांची संख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब दिलासा देणारी असली तरी नुसतं मराठी बोलून भागणार नाही तर मराठीत लिहावे सुद्धा लागणार आहे.तरच इतर प्रादेशिक भाषांसमोर आपण टिकू शकणार आहोत.
सरकारदरबारी मराठीसाठी फारसे काही होत नाही असे वाटत असताना कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करणार असल्याचे सांगितले आहे.याची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी आशा बाळगूयात.
इतर भाषांचा तिरस्कार नको पण आपल्या भाषेचा कमीपणासुद्धा वाटू देऊ नका. इतर राज्यांतले लोक आपल्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या दैनंदिन जीवनात, इंटरनेटवरील रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात आपली मातृभाषा वापरत असताना आपण त्यात मागे राहतोय की काय अशी शंका येतेय. आत्ताच यावर कृती केली नाही तर असेच सतत वाट पाहत बसावे लागेल.
या सगळ्यासाठी आजचाच दिवस का निवडला? असे काहीजण विचारतील. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी जशी देशभक्ती उतू जाते तसेच आज मराठी भाषेवरचे प्रेम उतू जातेय असे काहीजण म्हणतील.
माझ्या आसपास वावर असलेल्या अनेकांना पायमल्ली, अनुमोदन, संवैधानिक या आणि अशा अनेक शब्दांचे नुसते उच्चार जमत नाहीत. अर्थ तर लांबची गोष्ट झाली. मराठी आपल्याला इतकी नकोशी झालीये? मराठी भाषादिन ज्यांच्या गौरवार्थ साजरा केला जातो ते कुसुमाग्रज म्हणजे कोण हेच आज अनेकांना माहीत नसते. या निमित्ताने किमान कुसुमाग्रज हा गुगल सर्च तरी होईल. म्हणून हे सगळं आज लिहितोय.
आजचा दिवस म्हणजे फक्त निमित्त आहे. हे रोज झाले पाहिजे.मराठी वाचा, लिहा, बोला आणि वाढवा. त्यासाठी आपलाच हातभार गरजेचा आहे. ‘गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा!’ या आणि अशा अनेक मिम्जचा पाऊस पाडण्यापेक्षा रोज मराठीत बोलण्याचा आग्रह धरलात आणि अंगिकारलात तर खूप जास्त फरक पडेल. तर कुठेतरी ‘अमृतातेही पैजा जिंके’ वगैरे पंक्तींचा पुन्हा एकदा दाखला देता येईल. ‘लाभले आम्हास भाग्य’ वगैरे अभिमानाने सांगता येईल.
– आदित्य गुंड