वर्षभरात 20 हजार गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी; 1,125 नमुने आढळले दूषित
नगर – सर्वांना शुध्द पाणी मिळावे यासाठी सरकार कोट्यवधींचा खर्च करत असताना दुसरीकडे शंभर टक्के गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली असता या महिन्यात 36 गावांतील 63 पाणी नमूने दूषित असल्याचे आढळले आहेत. वर्षभरात हा आकडा 1125 चा होता.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमूने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आहेत त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने 20 हजार 382 गावांतील पाणी नमुन्यांची तापाणी केली. त्यात 1125 गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्त्रोतांचे पाणी दूषित आढळले,तेथे पाणी शुध्दीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मागील महिन्यात तपासण्यात आलेल्या 1305 पाणी नमुन्यांपैकी 63 नमुने दुषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 4.57 गेली आहे. काही तालुक्यांत मात्र पाणी तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्जत तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त असून या तालुक्यामध्ये अनुक्रमे 13 गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. तर, संगमनेर, पारनेर, राहुरी तालुक्यातही प्रत्येकी 9 गावांना दुषित पाणीपुरवठा केला जात आहे.
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांतील पाणी पिण्यास योग्य आहे का, याची नियमित तपासणी केली जाते. पाणी नमुने गोळा करून तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे होती. त्यानंतर मात्र यात बदल करण्यात येऊन पाणी तपासणीची जबाबदारी भूजलकडे देण्यात आली. आरोग्य विभागाकडून अजूनही साधारण दहा टक्के पाणी नमुने तपासणी केली जाते. जलसुरक्षकांमार्फत पाणी नमुने गोळा करून भूजल विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.जानेवारी महिन्यात 1305 पाणी नमुने तपासण्यात आले. यामध्ये 63 पाणी नमुने दूषित आढळले. ज्या पाण्याच्या स्रोतातील पाणी दूषित आढळले आहे, तेथील पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.
ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. मात्र, दर महिन्यात नवनव्या गावांमध्ये दूषित पाणी आढळणे सुरूच राहिले. पाण्यातील क्लोरीन सरासरी 33 टक्के असावे, असा नियम आहे. या महिन्यात 241 नमुने तपासण्यात आले. यात 13 ठिकाणी निकृष्ट नमुने आढळले. यात सर्वाधिक राहुरीत सहा, तर अकोले तालुक्यात 3 व पारनेरमध्ये दोन निकृष्ट नमुने आढळले. पाथर्डी व नेवासा तालुक्यातही एक-एक निकृष्ट नमुने आढळले. या तेरा ठिकाणी 20 टक्के पेक्षा कमी क्लोरीन पाण्यात आहे.
दूषित पाणी नमुने (कंसात तपासलेले नमुने)
पारनेर : 9 (112), अकोले : 3 (175), नगर : 7 (120), संगमनेर : 9 (179), शेवगाव : 0 (44), पाथर्डी : 1(84), राहुरी : 9 (96), श्रीगोंदे : 2(133), कोपरगाव : 4 (90), कर्जत : 13(40), नेवासे : 0 (25), राहाता : 2 (63), श्रीरामपूर : 4(70), जामखेडः 0 (74).
दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
पारनेर- रूईछत्रपती, अळकुटी, खडकवाडी, वासुंदे .अकोले- लाडगाव, आंबेवंगन, टीटवी .नगर- चास, टाकळी काझी, देवगाव .संगमनेर- कौठेकमळश्वर, घुलेवाडी, लोहारे, मीरपूर .पाथर्डी- निपाणीजळगाव .राहुरी- बारागावनांदूर, टाकळीमिया .श्रीगोंदा- कोळगाव . कोपरगाव- गोधेगाव, बोलकी, संवत्सर. कर्जत- बजरंगवाडी, वालवड, कारेगाव, पींपळवाडी, पोटरेवस्ती, कोंभळी, कोकणगाव, थेरगाव, निमगाव गांगर्डा. राहाता- तीसगाव मोठेबाबानगर, एकरूख बोरावकेवस्ती . श्रीरामपूर- भोकर, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान.