अध्यादेशानंतर स्पष्ट होणार निर्णय : अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा वगळल्या
पुणे – राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेतही आता पाच दिवसांचा आठवडा होणार का याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे. महापालिकेस राज्य शासनाचे आदेश लागू असल्याने या निर्णयाचा अध्यादेश आल्यानंतरच त्यात पालिकेलाही हा नियम लागू असणार आहे का, याबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय अस्थापना येत्या 29 फेब्रुवारीपासून शनिवारी व रविवारी बंद असणार आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांना इतर दिवशी 45 मिनिटे जादा काम करावे लागणार आहे. तसेच, या निर्णयातून अग्निशमन, पाणीपुरवठा तसेच आरोग्य सेवा वगळल्या आहेत. शासनाचे निर्णय महापालिकेलाही लागू होतात. त्यामुळे हा निर्णय पालिकेला लागू होणार का याबाबत प्रशासनात संभ्रम आहे.
राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला असला तरी पालिकेला तो लागू आहे की फक्त राज्य शासनाच्या विभागांनाच, याबाबत अध्यादेश निघाल्याशिवाय स्पष्ट होईल. तसेच, राज्य शासनाने महापालिकेसही हा नियम लागू केल्यास त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.