करंजी शाळेच्या वर्ग खोल्यांचे केले उद्घाटन
कोपरगाव (प्रतिनिधी) – स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मागे राहू नयेत. तेही इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने घडला जावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, कोपरगाव तालुका गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर असून, राज्यात देखील पुढे यावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी व्यक्त केली.
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व ब्राह्मणगाव गटातील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे होते. घुले म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भावी पिढीच्या सक्षमीकरणासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी प्रयत्नशील असून, पुढील वर्षीच्या नियोजनामध्ये शाळा खोल्यांच्या निधी उपलब्धतेसाठी प्राधान्य दिले आहे.
आ. काळे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, जि. प. सदस्य राजेश परजणे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्या विमलताई आगवण, सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, माजी सभापती अनसूयाताई होन, सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, वर्षा दाणे, काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, संजय आगवण, बाळासाहेब कदम, गोरक्षनाथ जामदार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता उत्तम पवार, केंद्र प्रमुख दिलीप ढेपले, राजेंद्र ढेपले, विद्याताई भोईर, रोहिदास होन, राहुल जगधने, गौतम बॅंकेचे संचालक अनिल महाले, नानासहेब रोहोम, सरपंच छबूराव आहेर उपस्थित होते.