गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली माहिती
मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केवळ विरोधकच नव्हे तर काही भाजप नेत्यांचेही फोन टॅप केले जात होते अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. या प्रकरणाचा तपास केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात होते असा आरोप आहे. त्याची चौकशी दोन सदस्यांच्या समितीकडून केली जात आहे.
या फोन टॅपिंग प्रकरणाचा चौकशीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याबद्दल कालच भाजपचे एक नाराज नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला महत्व आहे. गृहमंत्री म्हणाले की विरोधी नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू असतानाच फडणवीस सरकारकडून भाजपच्याच काही नेत्यांचेही फोन टॅप केले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे त्याचीही आता चौकशी केली जाईल.