नगर – अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकारी यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करत जिल्हा परिषदेचे सदस्य सुषमा दराडे यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार ही चौकशी पूर्ण झालेली आहे. या चौकशीत नात्यागोत्याची अडचण येऊ लागलेली आहे. त्यामुळे चौकशीचा कालावधी कमी जास्त केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये व गटविकास अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. तसेच जिल्हा परिषदेसमोर उपोषणही केले होते. त्यानुसार प्रशासनाने चौकशी तीन पथकांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या तीन पथकांपैकी दोन पथकांनी आपले अहवाल तयार करून ते प्रशासनाला सादर केलेले असून त्यामध्ये एकूण आठ जण दोषी आढळून आलेले आहेत.
मात्र या दोषींमध्ये काहींचे नातेवाईक अडकलेले असल्याने चौकशीचा कालावधी कमी करावा व आपल्या नातेवाईकांना वाचवावे यासाठी काहींची धडपड सुरु झालेली आहे. यासाठी आता अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये काहींच्या फेऱ्या सुरु झालेल्या आहेत. काहींकडून पत्र तर काहीजण आपल्याच पध्दतीने प्रशासनावर दबाव आणत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आता खमंग चर्चा सुरु झाली आहे.