मुंबई – मूळ पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामी याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे 130 कोटी भारतीयांचा अवमान असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे. सीएए, एनआरसी व एनपीआर वरून या सरकारची जी शोभा झाली आहे त्यावर तोंड लपवण्यासाठीच त्यांनी अदनानला हा पुरस्कार देऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे.
पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. अदनान सामी हा पाकिस्तानी वंशाचा असून त्याला सन 2016 मध्ये भारतीय नागरीकत्व देण्यात आले आहे. आता कोणताही पाकिस्तानी नागरीक जय मोदी या मंत्राचा जयघोष करून भारतीय नागरीकत्व मिळवू शकतो आणि त्याला पद्म पुरस्कारही मिळू शकतात अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे. आपल्या चुकीच्या धोरणाने मोदी सरकारने देशातील एका मोठ्या समाजाच्या बाबतीत जे अशांततेचे वातावरण निर्माण करून ठेवले आहे त्याची सारवासारव करण्यासाठी त्यांनी अदनानला पद्मश्री पुरस्कार दिला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यास आक्षेप घेतला आहे.