आरोग्यमंत्र्यांकडे सकारात्मक प्रतिसाद
रांजणगाव गणपती- येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कर्मचारी विमा महामंडळाचे रुग्णालय (ईएसआय) उभारण्यात यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदनाव्दारे केल्याची माहिती युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली. येथील एमआयडीसीत ईएसआय रुग्णालय उभारण्याची मागणी शेवाळे यांनी मंत्री टोपे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी मंत्री टोपे यांनी आश्वासन देत याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
औद्योगिक वसाहतीत सुमारे लाखो कामगार विविध कंपन्यात काम करीत असल्याने येथे ईएसआय रुग्णालयाची आवश्यकता आहे. हे रुग्णालय उभारल्यानंतर या रुग्णालयाचा रांजणगावसह सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शिरूर व चाकण येथील कामगारांना होणार आहे. या रुग्णालयाची नितांत आवश्यकता असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीत ईएसआय रुग्णालय उभारण्याची बाब चांगली आहे. याबाबत राज्य शासन टप्याटप्याने राज्यभरातील औद्योगिक वसाहतीमध्ये रुग्णालय उभारण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, ईएसआय रुग्णालय उभारणीबाबतचे निवेदन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले असता रांजणगाव एमआयडीसी येथे ईएसआय रुग्णालय उभारण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करणार असल्याचे वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले.