नवी दिल्ली : नव्याने लागू करण्यात आलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात शांततापूर्ण मार्गाने गेले महिनाभर सुरू असणाऱ्या निदर्शनांमुळे रस्ता अडवला जात असून त्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.
गेले 35 दिवस आम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे आमची गैरसोय होत आहे. याबाबत एफआयआर नोंदवून रस्त्यातील अडथळे दूर करावेत, असे या फिर्यादित म्हटले आहे.
दरम्यान, पोलिस उपायुक्त चिन्मय बिस्वल म्हणाले, रस्ता न अडवता निदर्शने सुरू ठेवावी म्हणून निदर्शकांशी चर्चा सुरू आहे. शाहीन बाग येथील आंदोलनामुळे काळिंदी कुंज रस्ता अडवला जात आहे. त्याबाबत दिल्ली पोलिसांनी लक्ष घालावे असे आदेश न्यायलयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांची आणि परीक्षार्थींच्या सुरक्षित वाहतुकीकडे लक्ष द्यावे, असेही न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.