मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी द्यावा, अशी भूमिका मांडणारे प्रकाश आंबेडकर यांच्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांनी टीका केली आहे. आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारी निषेधार्ह भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे. तसेच त्यांच्या या भूमिकेला आपला तीव्र विरोध असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळवण्यासाठी आंबेडकरी जनतेने प्रदीर्घ काळ संघर्ष केला. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध दुर्देवी असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि सुशोभीकरणाची गरज नसल्यामुळे त्याचा सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थान भेट घेतली. आंबेडकर यांनी 24 जानेवारीला राज्यव्यापी बंद पुकारला आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.