सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कर देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महात्मा गांधी हे भारतरत्नपेक्षा मोठे आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना केंद्र सरकारला याबाबत लिहिण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीशांनी म्हटले की, महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची आवश्यकता नाही. ते राष्ट्रपिता आहेत. ते अशा प्रकारच्या मान्यतांपासून वरच्या स्तरावर आहेत. लोक त्यांच्याकडे सन्मानाच्या नजरेतून पाहतात.
महात्मा गांधींना भारतरत्न देण्याच्या मागणीवरुन अनेकवेळा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींना भारतरत्न देणे म्हणजे त्यांचे योगदानाला कमी लेखणे असेल असे म्हणत प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.