पुणे – यंदाच्या मोसमातील द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली असून आत्तापर्यत 13 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात ही निर्यात वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात साधारणत: डिसेंबर ते मार्च हा कालावधी द्राक्ष हंगामाचा असतो. जानेवारीपासून निर्यात सुरु होत असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षाला बसला आहे. त्यामुळे यंदा गतवर्षी पेक्षा उत्पादन कमी होणार आहे. नाशिक आणि सांगली पट्यांमध्ये द्राक्षाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. त्यात नाशिक ची द्राक्ष ही निर्यातक्षम असल्याने या भागातूनच निर्यात जास्त होते. या द्राक्षांना दुबंई मार्केट मध्ये चांगली मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे स्वतंत्र निर्यात केंद्र सुरु करण्यात आले आहे. या निर्यात केंद्रातून नुकतीच द्राक्षे ही दुबईला पाठविण्यात आली. हंगाम सुरु झाल्यापासून आत्तापर्यत 13 टन द्राक्षांची निर्यात झाली असली तरी पुढील आठवड्यापर्यत ही निर्यात 39 टन पर्यत जाईल असा अंदाज आहे.गेल्या वर्षी राज्यातून तब्बल 230 टन द्राक्षे निर्यात झाली होती. सध्या निर्यातक्षम द्राक्षांना 80 ते 100 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.