चिंबळी – विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देणे आवश्यक असून यात शाळांची भूमिका महत्त्वाची आहे. संस्कृती टिकली तरच देश टिकेल यासाठी लहान वयापासून देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार दिले जावेत. कुटुंब व विद्यालय यांना यासाठी कार्य करावे लागेल, असे मत चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलचे संस्थापक अधक्ष शिवाजी गवारे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात खराबवाडी येथील श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे पाचवे स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी लहान बालकांसह विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद ठरले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवाजी गवारे व पत्रकार सुनील बटवाल यांच्या हस्ते तर संस्थेच्या सचिव विद्या गवारे व श्री समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे यांच्या उपस्थितीत श्री गणेश, सरस्वती माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले, त्यावेळी गवारे बोलत होते.
यावेळी भिकाजी कड, अनिल कड, बबन खराबी, प्राचार्य अनिता टिळेकर, फ्रान्सिस्का सालधना, राणी पाटील, अश्विनी देवकर, संतोष गवारे, विद्या पवार, राम मुदगुले, अर्जुन जाधव, संतोष साकोरे, अक्षय टेमगिरे आदि मान्यवरांसह सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी शिवाजी गवारे, विद्या गवारे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प, सन्मानचिन्ह, देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच पत्रकार दिनानिमित्त “प्रभात’चे वार्ताहर सुनील बटवाल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थी वर्गाने गीत गायन, नृत्य, समूह नृत्य, मिमीक्री, फॅन्सी ड्रेस असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.