प्रकाश राजेघाटगे
बुध – पिकांवरील रोगांचे प्रमाण वाढल्याने पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. पूर्वी घरासमोर अंगणातील झाडांवर पहाटेच्या प्रहरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत होता. हे चित्र आता दुर्मीळ झाले आहे. पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसणारे आकाश आता पांढरे शुभ्र दिसत असून वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसत आहे.
पूर्वी शेतात नांगरट सुरू करताना बैलजोड्यांच्या मागे पाचपन्नास बगळे फिरायचे. नांगरण करताना मातीतील किडे, अळ्या, कृमी वर येत आणि आनंदी बगळे त्यांच्यावर लगेच ताव मात, असे चित्र दिसत असे. मात्र, आता पिकांच्या आरोग्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी होत असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. मानवाने नवनवीन शोध लावल्याने जगाची प्रगती झाली असली तरी निसर्गाची प्रचंड हानी होत आहे.
सिमेंटची जंगले, महामार्गांची बांधणी, उद्योग, कारखाने उभारण्यासाठी वृक्षांच्या कत्तली होत आहेत. झाडांवर राहणाऱ्या लाखो पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली आहे. वाढते प्रदूषण आणि मोबाइलमुळे होणारे रेडिएशन यामुळे अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.