सातारा – चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे 83 दिवस बाकी असताना सातारा पालिकेच्या वसुली विभागापुढे मार्चअखेरीस तब्बल सहा कोटी रुपयांची करांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान आहे. वसुली करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणींमुळे थकबाकीचा आकडा फुगत जाऊन तीन कोटी 50 लाख 19 हजार 262 च्या घरात जाऊन पोहोचला आहे.
नगरपालिका शिक्षण मंडळ, गट ई खोकी, महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी व मटण मार्केटचे भाडे थकल्याने पालिकेच्या उत्पन्नाला खीळ बसत आहे. या वसुलीत येणारी कायदेशीर अडचण पालिका कशी सोडवणार, हा प्रश्नच आहे.
दैनिक “प्रभात’ने पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाची प्रत्यक्ष वसुली आणि मागील व चालू मागणीची माहिती घेतली असता त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
स्थावर जिंदगी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चालू व मागील वर्षाची एकूण मागणी सात कोटी नऊ लाख 16 हजार 609 रुपये आहे. यापैकी केवळ तीन कोटी दोन लाख रुपयांची वसुली गेल्या आठ महिन्यांमध्ये झाली आहे. एकूण उद्दिष्टाच्या प्रमाणात ही वसुली अवघी 18 ते 20 टक्के असल्याने वसुली विभागापुढे थकबाकीचा डोंगर उभा आहे. येत्या 31 मार्चअखेर सहा कोटी सात लाख 98 हजार 266 रुपयांची वसुली करण्याचे आव्हान वसुली विभागाच्या सहा पथकांपुढे आहे. पुढील 83 दिवसांमधील अपेक्षित वसुलीचा हिशोब केला तर दिवसाकाठी 81 हजार 906 रुपयांची करवसुली करावी लागणार आहे.
थकबाकीचा विचार करता इमारत वाटप फी, गाळे व जागावाटप फी या प्रकारात थकबाकीचे प्रमाण प्रचंड आहे. पालिका शिक्षण मंडळाचीच थकबाकी तीन कोटी 12 लाख रुपये आहे. गट ई खोकी नऊ लाख 70 हजार, महावितरण 21 लाख 42 हजार 539 रुपयांची थकबाकी पालिकेला अडचणीची ठरत आहे. मटण मार्केटची थकबाकी सहा लाख 44 हजार 158 रुपये प्रलंबित असून थकबाकीचा आकडा तीन कोटी 50 लाख 19 हजार 262 रुपयांच्या घरात आहे. या वसुलीत कायदेशीर अडचणी येत असल्याने हा महसूल पालिकेला मिळत नसल्याची माहिती स्थावर जिंदगी विभागाचे अधिकारी प्रशांत खटावकर यांनी दिली.
थकबाकीएवढाच दंड
वसुली विभागाची जवाबदारी सध्या हिमाली कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्याकडून पूर्ण कार्यक्षमतेने काम होत नसल्याने वसुलीवर मर्यादा येत आहेत. आधी दामले, नंतर अतुल दिसले आणि आता हिमाली कुलकर्णी अशा बदलांमुळे सलग वसुली मोहीम झाली नाही. कायदेशीर गुंता न सोडवल्याने साडेतीन कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
वसुली विभागात काही प्रकरणांमध्ये थकबाकीएवढीच शास्ती (दंड) असल्याने थकबाकीदाराने भरलेली रक्कम शास्तीत जाते आणि मूळची थकबाकी तशीच राहते. साताऱ्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची थकबाकी तीस लाख रुपये तर शास्ती 31 लाख रुपये, असा प्रकार समोर आला आहे.