कानपूर : प्रख्यात कवी फैझ अहमद फैझ यांची कविता हिंदु द्वेष्टी आहे का हे तपासण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही, असे स्पष्टीकरण आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी गुरूवारी दिले. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का) झालेल्या निदर्शनात या संस्थेत विद्यार्थ्यांनी हम देखेंगे ही कविता म्हटली होती. ती हिंदुद्वेष्टी असल्याचा आरोप झाल्याने वादळ उठले होते.
याबाबतची वस्तुस्थिती अशी आहे की, विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात काही कविता म्हटल्या गेल्या. त्यानंतर समाज माध्यमांत पोस्ट केल्या. त्या बदनामीकारक होत्या, अशा आशयाच्या तक्रारी समाजाच्या विविध स्तारातून संस्थेकडे आल्या. मात्र फैझ अहमद यांची कविता हिंदुद्वेष्टी आहे की नाही हे पाहण्यासाठी समिती स्थापन केली आहे हे पूर्णत: दिशाभूल करणारे आहे, असे करंदीकर यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त टेलीग्राफ या दैनिकामने दिले आहे.
दरम्यान, कवी फैझ अहमद फैझ यांना हिंदू द्वेष्टे संबोधणे हे इतके अतार्किक आणि हस्यास्पद आहे की त्यावर काही गांभीर्याने बोलणे अवघड आहे. हा कवी पुरोगामी साहित्यिक चळवळीतील अढळ तारा होता, असे प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सांगितले. कानपूर आयआयटीने फैझ अहमद यांची हम देखेंगे ही कविता हिंदूद्वेष्टी आहे का? हे तपासण्यासाठी समिती नेमली आहे, यावर अख्तर यांनी हे मत च्यक्त केले.
फैझ यांनी आपले निम्मे आयुष्य पाकिस्तानच्या बाहेर व्यतीत केले. तेथे त्यांना पाकिस्तानद्रोही म्हणून उल्लेख व्हायचा. त्यांनी हम देखेंगे ही कविता तत्कालीन पाकिस्तानी लष्करी हुकूमशहा झिया उल हक आणि जात्यंध सरकारच्या विरोधात लिहिली, असे अख्तर यांनी सांगितले.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधिंद्र भदोरीया यांनीही फैझ अहमद यांच्या या कवितेला हिंदूद्वेष्टे असल्याच्या आरोपावर टीका केली. फैझ अहमद हे पाकिस्तानातील बंडखोर कवी होते. भारत आणि पाकिस्तानातलि संबंध मित्रत्वाचे असावेत, असे त्यांचे मत होते. भारत आणि पाकिस्तानातील मैत्रीच्या संबंधांचा पुरस्कार केल्याबद्दल झिया उल हक यांच्या कारकिर्दीत त्यांनी कारावास भोगला होता, असे त्यानी सांगितले.
प्रख्यात कवी फैझ अहमद यांची लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है ही कविता हिंदुविरोधी आहे का? हे ठरवण्यासाठी नुकतीच कानपूरच्या द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) समिती स्थापन करण्यात आली आहे. काही प्राध्यापकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही समिती स्थापन करण्यात आली.
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी 17 डिसेंबर रोजी दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवणारा मोर्चा काढला होता. या मोर्चात विद्यार्थ्यांनी लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है हे गीत गायले होते. मात्र आयआयटीचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी या गीतावर नंतर आक्षेप घेतला. ते म्हणाले, व्हिडिओत विद्यार्थ्यांनी फैझ यांची कविता म्हटली असल्याचे दिसत आहे. हे काव्या हिंदू द्वेष्टे आहे.
या कवितेच्या शेवटच्या ओळीत सर्व मुर्ती नष्ट केल्या तरी अल्लाहचे अस्तित्व कायम राहील, असे म्हटले असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. दरम्यान या प्राध्यापकावर समाज माध्यमांत जातीय विद्वेषक मजकूर टाकल्या प्रकरणी बंदी घालावी अशी मागणी केली आहे. आयआयटी कानपूर विद्यार्थ्यांच्या वेब पोर्टलवर मात्र या गीताचा मुळ अर्थ खाय आणि जामियात केलेल्या हल्ल्याला ते कसे लागू होते हे सांगणारा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.