सीएएवरून कर्नाटकच्या सी.टी.रवी यांचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. तर अनेक ठिकाणी याविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यादरम्यान, या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यांकांविरोधात कर्नाटकातील मंत्री सी.टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर लोकांनी आपला संयम गमावला तर गोध्रासारखे दंगे पुन्हा होऊ शकतात, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
कर्नाटकाचे पर्यटन मंत्री सी.टी.रवी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमात व्हायरल झाला आहे. यामध्ये ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. तुम्ही विसरलायत जर लोकांनी आपला संयम गमावल तर काय होतं. तुम्ही मागे वळून पाहिला आणि आठवा गोध्रानंतर काय झालं होतं. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असं ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही पाहतोय की तुम्ही कसं सरकारी संपत्तीचं नुकसान करत आहात. आमचा संयम आमचा कमकुवतपणा समजू नका, असंही ते म्हणाले. रवी यांच्या या वक्तव्याच्या सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तसंच यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश गुंडू राव यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच वक्तव्य म्हणजे एकप्रकारे देण्यात आलेली धमकी आहे. एका पदावर असताना त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यानी नमूद केले.