– तुषार रंधवे
पुणे – सुपर मॉल वॉलमार्ट कंपनीने व्यापारवृद्धीकरिता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. मॉलसाठी 12 शहरांमध्ये भूखंड उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून, त्यामुळे 24 हजार जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. मात्र त्याची झळ स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.
सुपर मॉल शृंखलेत जगातील सर्वांत बलाढ्य असलेल्या वॉलमार्टनेदेखील भारतात या क्षेत्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करुन, प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याला गतवर्षी देशपातळीवर व्यापाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, तरीदेखील या कंपनीने देशातील जम्मू-काश्मीर, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये एकूण 28 सुपर स्टोअर्स सुरू केली आहेत. तर, राज्यात औरंगाबाद आणि अमरावती दोन शहरांमध्ये मॉल सुरु करुन महाराष्ट्राच्या व्यापारी क्षेत्रात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये मोक्याच्या ठिकठिकाणांवरील भूखंडांची कमतरता लक्षात घेऊन खासगी व्यक्तीकडून भूखंड विकत घेण्याऐवजी वॉलमार्टने एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी केली आहे. त्याची महायुतीच्या काळात तत्काळ दखल घेत, भूखंड वाटप धोरणात बदल करण्याची तत्परता दाखवली आहे. या कंपनीला भूखंड उपलब्ध करुन देताना, औरंगाबाद व अमरावती या दोन्ही शहरात कंपनीच्या मॉलमुळे चार हजार जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे एमआयडीसीने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे. या रोजगाराचा संदर्भ देत भूखंड उपलब्ध करुन देण्यासाठी भूखंड धोरणातील बदलाचे समर्थन केले आहे. रोजगार निर्मितीचा हा वेग पाहता राज्यातील 12 शहरांमध्ये या कंपनीचे मॉल सुरू केल्यास एकूण 24 हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.