रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात वाढले
पुणे/पिंपरी – रेल्वेचे रुळ हे केवळ रेल्वे धावावी, यासाठीच असतात. ओव्हरब्रिजवरून न जाता रेल्वे रुळ ओलांडण्याचा “शॉर्टकट’ हा मृत्यूकडे नेणारा शॉर्टकट ठरत असतानाही घाईगडबडीत रोज हजारो नागरिक ही चूक जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणच्या रेल्वे प्रवाशांची हीच घाई त्यांच्या जीवावर बेतत आहे. रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवर गेल्या तीन वर्षांत 880 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. दरवर्षी हा आकडा वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये 17 हजार 540 जणांना रेल्वे रुळ ओलांडतांना पकडण्यात आले. रेल्वेतून उतरल्यावर घरी किंवा कामाच्या ठिकाणी लवकर जाण्याच्या गडबडीत अनेक प्रवासी शॉर्टकट म्हणून रेल्वेरुळ ओलांडतात. तर रेल्वे रुळाच्या आसपास राहणारे नागरिकदेखील रेल्वे मार्गाचा वापर रहदारीच्या मार्गासारखा करण्याचा प्रयत्न करून जीव गमावितात.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवरील आकडे याबाबत विचार करायला लावणारे असून आतापर्यंत 2017 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत 880 नागरिकांना रेल्वेरुळ ओलांडतांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, रेल्वे कायदा कलम 147 नुसार 17 हजार 540 जणांना या गुन्ह्यासाठी पकडले आहे. यातून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 19 लाख 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी रेल्वेकडून ब्रिज उभारण्यात आले आहेत. या ब्रिजजा वापर करून नागरिकांनी दुसऱ्या बाजुला जाणे अपेक्षित असते. मात्र, लवकर दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी रेल्वेरुळावरूनच शॉर्टकट मार्ग स्वीकारत धोकादायकरित्या रुळ ओलांडतात, यामुळे अनेकांना जीव गमवाला लागला आहे. याबाबत नागरिकांनी जागरुकता बाळगणे महत्त्वाचे आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वर्षभर उपक्रम राबविले जातात. तरीसुद्धा सातत्याने याकडे दुर्लक्ष केले जाते.
वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष 2017 मध्ये 5850 जणांना रेल्वे रुळ ओलांडताना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 6 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर रेल्वे रुळावर मृत्यू झालेल्यांची संख्या 300 इतकी आहे. वर्ष 2018 मध्ये 5670 जणांना रेल्वे रुळ ओलांडताना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 6 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी 15 जणांना तरुंगवासाची शिक्षाही झाली. तर 2017 साली रेल्वे रुळावर मृत्यू झालेल्यांची संख्या 308 इतकी आहे.
ऑक्टोबर 2019 पर्यंत सहा हजार नागरिकांना रुळ ओलांडताना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सहा लाख 65 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर 26 जणांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. 2019 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 272 जणांना रेल्वे रुळावर मृत्यू झाला.
रेल्वे प्रवाशांच्या जीवाला कुठलाही धोका होवू नये, यासाठी रेल्वे स्थानकांवर ब्रीजची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, शॉर्टकटसाठी प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनेचे पालन करावे व आपल्या जीवाला धोक्यात घालू नये. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात.
– मनोजकुमार झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग