नवी दिल्ली – महिलांच्या सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. “जे पुरुष महिलांचा छळ करतात, त्यांना स्वतःला माता-भगिनी असतात. त्यामुळे महिलांचा सन्मान करण्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी.’ असे भागवत म्हणाले.
“जरी उर्वशी वाटेत आली, तरी अर्जुनाने नितीमत्तेचा रस्ता सोडला नाही. त्याने उर्वशीला मातेसमान वागवले. त्याचप्रमाणे महिलांचा सन्मान आपल्या समाजामध्ये व्हायला हवा. ‘ असे भागवत म्हणाले. स्वामी ग्यानानंदांच्यावतीने आयोजित गीता महोत्सवामध्ये भागवत बोलत होते.
गीतेमध्ये अध्यात्माचे सर्व ज्ञान संक्षिप्त स्वरुपात दिले गेले आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या उपनिषदांचे हे सार आहे. कर्तव्याबरोबरच दातृत्व असावे, हाच संदेश गीतेत दिला गेला आहे.
आपल्याला चांगले म्हणावे, म्हणून आपण विशिष्ट कर्म करावे, असे नेहमी म्हटले जाते. मात्र फारच कमी लोक योग्य मार्गावर स्थिर राहतात. बाकीचे सर्वजण मार्गापासून भटकतात. जर आपल्याला एखाद्या कामामध्ये गुंतवून ठेवले नाही, तर आपले मन नकारात्मकतेकडे ओढले जाते. त्यासाठी मनाला सकारात्मकतेची जोड द्यायला हवी, असे भागवत यांनी सांगितले.