खा. शरद पवार : “सह्याद्री’च्या गळीत हंगामासह कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन
मसूर/कोपर्डे हवेली – शेतीच्या क्षेत्रात जगभरात नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. युवा शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता इतर शेतीपूरक उद्योगावर लक्ष केंद्रित करावे. उसाच्या जाती, पीकपध्दत, जमीनीची प्रतवारी सुधारण्यासाठी शेतीमालावर संशोधन प्रक्रिया करणे गरजेचे असून यामध्येही आधुनिकता आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री कारखान्याचा गळीत हंगाम व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, प्रा. एन. डी. पाटील, आ. मोहनराव कदम, शरद लाड, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, देवराज पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, संचालक माणिक पाटील, व्हाइस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, सुहास बोराटे उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, शेतीत अनेक पर्याय असतात, त्यांचा शेतकऱ्यांनी अबलंब करून शेतीत आधुनिकता आणणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांच्या पोरांनी केवळ शेतीत न राहता एकाने शेती तर दुसऱ्याने नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा सल्लाही खा. पवार यांनी यावेळी दिला.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, गाळप क्षमता वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील विरोधी सरकारने आम्हाला परवानगी दिली नाही. त्यामुळे कारखान्याकडे नोंद झालेल्या उसाचे गाळप करणे शक्य होत नाही. परिणामी कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास तीस ते चाळीस टक्के ऊस हा शेतकऱ्यांना दुसऱ्या कारखान्याकडे गाळपासाठी द्यावा लागतो. राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडीवर पवार साहेब योग्य मार्ग काढतील असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आबासाहेब पवार तर आभार मानसिंगराव जगदाळे यांनी मानले.