कार्तिकीआधी आळंदी नगरपरिषदेची कारवाई
आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज यांचा कार्तिक वारी सोहळा हा दि. 20 ते 26 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमिवर वारकऱ्यांना मोकळा श्वास घेता यावा, या दृष्टीने आळंदी नगरपालिकेने आज (शुक्रवारी) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आळंदीतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
यात संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग, मरकळ चौक (पाण्याच्या टाकी खाली), देहू फाटा (वाय जंक्शन), चाकण चौक, सर्व फूटपाथ आदी ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. सर्वात मोठी कारवाई म्हणजे आळंदी नगरपरिषद चौकातील हॉटेल तसेच पाण्याच्या टाकीखाली अनधिकृतपणे बांधलेले शेड पूर्णपणे अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले. ही कारवाई कार्यालयीन आदेशाच्या अधीन राहून मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
नगरपरिषदेच्या मागे असणारी भाजी मंडई येथील प्रत्येकी 3000 रुपये जागा भाडे वसूल करून सुमारे साडेतीन लाखांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. यापुढे आणखी चार दिवस उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्यात येतील, असे अतिक्रमण पथक प्रमुख रामराव खरात यांनी सांगितले.
दोन जेसीबी, पुरेसे कर्मचारी-अधिकारी ट्रॅक्टर व मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात आजची अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळी अशोक राजगुरू, अभियंता संघपाल गायकवाड, निखिल पाटील, शिपाई रमेश थोरात, भागवत सोमवंशी, मल्हारी बोरगे, मुकादम मालन पाटोळे आदींसह कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता.