जिल्हा शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश काकडे यांचा आरोप
वाघळवाडी – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना प्रती महिना 5 किलो प्रमाणे साखर मिळते तसेच दीपावलीसाठी अतिरिक्त 10 किलो साखर मिळत होती. परंतु, याबाबतचे नियम मोडीत काढून कारखान्याकडून 20 किलो साखर देण्यात आली आहे. यातून कारखान्याचा तोटा झाला असून साखर आयुक्त कार्यालय अथवा आयकर विभाग (इन्कम टॅक्स) यांच्याकडून कारखान्यावर कारवाई झाल्यास तोट्याची रक्कम सभासदांकडून वसुल न करता ती वैयक्तिकरित्या विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाकडून वसुल करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश शिवाजीराव काकडे यांनी केली आहे.
सोमेश्वर कारखान्यातील अतिरिक्त साखर वाटपाचे नाट्य रंगले असून याबाबत याबाबत काकडे यांनी पत्रकात म्हंटले आहे की, साखर कारखान्यासंदर्भातील एका दाव्याच्या निकालात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार साखर आयुक्त यांनी काढलेल्या पत्रकानुसार (सरक्युलर, दि. 1/3/2006) सभासदांना नियमबाह्य साखर विक्री केली जात असल्यास अशा कारखान्यास आयकर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे नमूद केले आहे. त्यामुळे या आदेशाचा भंग झाल्यास कारखान्याचा तोटा केल्याबद्दल संचालक मंडळावर कारवाई केली जाईल.
विशेष म्हणजे सोमेश्वर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांपूर्वी याबाबत याच विषयावर चर्चा होवून जादा (5 किलोंच्या वर) साखर देता येणार नाही, असे सांगून या विषयावर सभा गुंडाळण्यात आली होती. मात्र, आता हाच नियम मोडून सभासदांना 20 किलो साखर वाटप करण्यात आली आहे. याकरीता आता चेअरमन यांनी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली का? याकरीता आयकर (इनकम टॅक्स) भरावा लागणार नाही का? भविष्यात कारवाई झाल्यास याची जबाबदारी सभासदांवर टाकणार का? असे सवाल सतिश काकडे यांनी केले आहेत.
साखर आयुक्तांकडुन परवानगी घेवुन दिपावलीच्या आत सर्व सभासदांना वाढीव साखरही देता आली असती. परंतु, हा कारखाना स्वत:च्या मालकीचा आहे, असे चेअरमन यांना वाटत असावे म्हणून चेअरमन यांनी सर्व नियम मोडले आहेत. संचालक मंडळाची बोर्ड मिटींग न घेता स्वत:च निर्णय घेतलेला आहे. तसेच आम्ही माहिती घेतली असता गेट सेल साखर दुकानातून सभासदांना भुकटीची साखर दिली गेली असल्याचेही समजते, असेही काकडे यांनी पत्रकात म्हंटले आहे.
‘वाढीव’ प्रकार पवारांना कळविणार…
कारखान्याच्या 27 हजार 400 सभासदांपैकी कित्येक सभासदांचा किमान 3 वर्ष देखील ऊस आलेला नाही. त्यामुळे सोमेश्वर कारखान्यात काही हजार सभासद हे साखरी सभासद आहेत, असे निदर्शनास येत आहे. तसेच साखर वाटपाबाबतची सर्व माहिती आम्ही कारखान्यास दि.18/10/2019 रोजी लेखी स्वरूपात मागितली आहे परंतु, कारखान्याने आज अखेरपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे आम्ही साखर आयुक्तांकडे वाढीव साखर वाटपाबाबतची तक्रार केली आहे. चेअरमन हे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हुकूमशाही पद्धतीने दिवाळखोरीत ढकलत असल्याचे आमदार अजित पवार यांना कळविणार आहोत.