सातारा – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली, शेतपिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते, पूल वाहून गेले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीककर्ज माफ व्हावे, जमिनीची धूप झाली त्याचाही विचार व्हावा, घरांची पडझड, रस्ते, पूल वाहून गेल्याने शासनाने निधी द्यावा, असे ठराव करत जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत एकजूट दाखवत जिल्हावासियांना दिलासा दिला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील सहा आणि ऐनवेळचे 17 असे 23 विषय एकमताने मंजूर झाले. सदस्यांना समिती सदस्य निवडीचा अजेंडा सभेपूर्वी मिळाला नसल्याचे सदस्य निवडीचा विषय सत्ताधाऱ्यांना तबकूब ठेवावा लागला. अतिवृष्टीबाबत झालेल्या चर्चेत फलटण पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ म्हणाल्या, “फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले.
अनेक घरांची पडझडीसह रस्ते, पुलांची दयनीय अवस्था झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सभागृहाने गांभीर्याने विचार करुन मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत.’ भाडळे भागातील कृषी सहाय्यक गेली अडीच वर्षे संपर्कात नाहीत. प्रत्यक्ष पाहणी करुन ते पंचनामे करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी डॉ. अभय तावरे यांनी केली. याबाबत संबंधितांवर कारवाईच्या सूचना अध्यक्ष संजीवराजे यांनी केल्या. अरुण गोरे यांनीही माण तालुक्यातील परिस्थितीची माहिती सभागृहाला दिली. शासन स्तरावरुन मदत देऊन बळीराजाला आधार देण्याची त्यांनी मागणी केली. ज्येष्ठ सदस्य भीमराव पाटील म्हणाले, “सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. 65 टक्के पावसाचा निकष न लावता 33 टक्के नुकसान झाले असल्यास सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे महसूल, कृषी विभागाने गांभीर्याने पंचनामे करावेत.
” सुरेंद्र गुदगे म्हणाले, “”शासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. फळबागांना हेक्टरी 18 हजार, बागायती शेतीला हेक्टरी 13 हजार 500, जिरायती शेतीस हेक्टरी 6500 रुपये नुकसान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. वास्तविक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना सरकारने आधार देण्याची गरज असतानाही सरकारला याचे गांभीर्य नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.’ मानसिंगराव जगदाळे म्हणाले, “जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देऊन पीककर्ज माफीचा ठराव करण्यात यावा.’
या चर्चेत मंगेश धुमाळ, बापूसाहेब जाधव, उदयसिंह पाटील, धैर्यशील अनपट, जिजामाला निंबाळकर यांनी सहभाग घेतला. सभागृहाच्या भावनांचा विचार करत अध्यक्ष संजीवराजे यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, पीककर्ज माफीसह हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा ठराव घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. ताथवडे (ता. फलटण) येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित करत आरोग्य केंद्र सुरु होत नसल्याने नाराजी व्यक्त केली.
लवकरात लवकर याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली. “महालॅब’च्या मुद्यावरुन सुरेंद्र गुदगे व रमेश पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. “महालॅब’चे टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांचे चांगले काम असल्याबाबत म्हणणे चुकीचे असल्याचे गुदगे म्हणाले. दिव्यांग मुलांचे इयत्ता दहावीचे फॉर्म भरण्याची मुदत 19 तारखेपर्यंत असतानाही जिल्हा रुग्णालयाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने सुरेंद्र गुदगे, भीमराव पाटील, सागर शिवदास यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजोग कदम यांना सभागृहात बोलावून घेण्यात आले. त्यांनी दोन दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
सदाशिवगड (ता. कराड) येथील निलंबित शिक्षकाची अद्याप चौकशी सुरु असतानाच पुन्हा त्याला त्याच ठिकाणी नेमण्यात आले असून शिक्षण विभागात नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न निवास थोरात यांनी उपस्थित केला. संजीवराजे यांनी याबाबत चौकशीच्या सूचना केल्या.
पूरग्रस्त भागात देण्यात येणाऱ्या कृषी पंपाबाबत उदयसिंह पाटील, बापूसाहेब जाधव, मानसिंगराव जगदाळे आदींनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत कृषी सभापती मनोज पवार यांनी दिलेल्या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले. येत्या डिसेंबरअखेर अनुकंपा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजीवराजे यांनी सांगितले. डेग्यूचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असून प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी केली.