इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोटींचा फटका : वादळी तडाख्यात तुंटपुंजी मदत
नीरा- नरसिंहपूर – इंदापूर तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वादळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या लालफितीत शेतकऱ्यांचा पंचनामा अडकला होता. त्यात राज्यातील राजकारणातील अस्थिर वातावरण शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, लाखो रुपयांचा फटका बसला असताना शासकीय मदत तुटपुंजी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे वादळी पावसाने नुकसानीत गेलेला शेतकरी आता पुरता घायाळ झाला आहे.
इंदापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाई पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे निसर्गाचा तडाखा इतका जोरदार आहे की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता भुईसपाट झाला आहे. नीरा आणि भीमा नद्यांच्या पाण्यामुळे समृद्ध झालेला तालुका निसर्गाच्या लहरीपणामुळे बेजार झाला आहे. त्यातच डाळिंब, पानमळे, द्राक्ष, तरकारी पिके आदी नगदी पिकांवर तालुक्याचे अर्थकारण गतिमान झाले आहे. मात्र, याला निसर्गाने ब्रेक लावला आहे.
त्यातच प्रशासनातील लालफितीचा कारभार कारणीभूत ठरला आहे. एकीकडे निसर्गाचा रुद्रावतार आणि दुसरीकडे प्रशासनाचा चंचलपणा शेतकऱ्यांच्या दशावताराला कारणीभूत ठरला आहे.
निसर्गाच्या नाना तऱ्हा –
एक जानेवारीपासून इंदापूर तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली. त्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कंबर कसली. मात्र, नियोजनाअभावी कंबरडे मोडले. यात सहा महिने गेले. शेतकऱ्यांना झळ बसली ती बसलीच. त्यानंतर जुलैपासून जोरदार पाऊस बरसत राहिला. त्यानंतर पुराचे पाणी नीरा आणि भीमा नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांच्या तोंडात शिरले. परतीच्या पावसाने पाण्यासाठी कासावीस झालेले तलाव तुडुंब झाले. वादळी पावसाने नगदी पिकांचा घोट घेतला.
पंचनाम्याची पूर्तता कधी होणार?
इंदापूर तालुक्यातील सर्वच गावांत पिकांचे नुकसान झाले आहे. यात खरिपातील पिके हातातोंडाशी आलेली वाया गेली आहेत. त्यानंतर नगदी पिकांना झळ बसली आहे. शासकीय पातळीवर अधिकारी हा एकच दुवा आहे. परंतु त्यावरील रिमोट कंट्रोल अजून राज्यात नाही. विधानसभेनंतर राज्यात अस्थिर सरकार आहे. जाहीर झालेली 10 हजार कोटींचा रक्कम तोकडी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्यासारखे आहे.