हैदराबाद – अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा श्रद्धेचा वस्तुस्थितीवरील विजय आहे अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेैसी यांनी दिली आहे. या निकालावर आम्ही समाधानी नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय खरोखरच सर्वोच्च आहे पण ते अचूक असू शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी सरन्यायाधीशानेच मध्यंतरी हे विधान केले होते. आज ते खरे ठरले आहे असे त्यांनी नमूद केले. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांच्यावरच आता ट्रस्ट स्थापन करून मंदिराच्या उभारणीचे काम सोपवण्यात आले आहे अशी तिरकस टिप्पणही त्यांनी भाजपवर त्यांचे नाव न घेता केली.
मुस्लिमांना न्यायालयाने पाच एकर स्वतंत्र जमीन देण्याचा निर्णय दिला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या देशातला मुस्लीम इतका दीनदुबळा नाही, जो तेवढी जमीन खरेदी करू शकत नाही. आम्हाला कोणतीही खैरात नको आहे.
आम्ही ही आमच्या हक्काची लढाई लढत होतो. भारताची वाटचाल आता हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे, एनआरसी, सिटीझन्स ऍमेंडमेंट कायदा ही सारी त्याचीच लक्षणे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.